भद्रावतीत ट्राफिक सिग्नलसाठी आंदोलनाचा इशारा
स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार चौकातील वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार समोरील चौकात तातडीने ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी करत विनय किशोर अंबाघरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. मागणी मान्य न झाल्यास ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भद्रावती शहराची लोकसंख्या ६० हजारांपेक्षा अधिक असून शहरात आयुध निर्माणी चांदा, वेकोलि, जैन मंदिर, नागमंदिर, बुद्धलेणी तसेच वरद विनायक गणेश मंदिर यांसारखी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनांची ये-जा होत असते.
स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे स्टेशन रोड हा शहरातील प्रमुख मार्ग असल्याने या चौकात सतत वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी अनेक वेळा ट्राफिक सिग्नल बसविण्याबाबत निवेदने देण्यात आली, मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वाहतुकीचे वाढते प्रमाण आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अंबाघरे यांनी स्पष्ट केले आहे.
या निवेदनाच्या प्रती खासदार प्रतिभाताई धानोरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, तहसीलदार भद्रावती तसेच भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.



