ताज्या घडामोडी
विदर्भात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान
शासनाने एकरी २५ हजार रुपये प्रमाणे नुकसानभरपाई द्यावी
चांदा ब्लास्ट
गेल्या दोन आठवड्यापासून संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने नद्या, नाले यांना पूर आला आहे. यामुळे नदी व नाले असलेल्या गावातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने अनेक शेतकर्यांची जमीन खरडून गेली असून या शेतातील कापूस व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. धान पट्ट्यातही पुराचे पाणी जास्त दिवस साचून राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकर्यांना तातडीने मदतीची आवश्यकता असून राज्य सरकारने निकषांवर अवलंबून न राहता एकरी २५ हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी प्रांतीय शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी व जीवती या तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे वर्धा आणि पैनगंगा नदीला पूर आला. हे पुलाचे पाणी संपूर्ण परिसरातील शेतीत पसरले. यासंदर्भात जेष्ठ शेतकरी नेते, माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी राजुरा क्षेत्रातील चारही तालुक्यांचा दौरा केला आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. गोंडपिपरी तालुक्यात तलाव फुटल्याने करंजी या गावात पाणी शिरल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. आक्सापूर येथे तलावाचे पाणी शेतात आले. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच शेतकर्यांनी कर्ज करून शेतीची लागवड केली आहे. त्यांना आता दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.
या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या जमिनीचे तातडीने पंचनामे करून सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, शेतकरी महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा प्रज्ञा बापट, राजाभाऊ पुसदेकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, संजय कोले, अनिल घनवट, मधुकर हरणे, विजय निवल, शैला देशपांडे, सीमा नरोडे, गीता खांडेभराड, मदन कामडी, सतीश दाणी, अरुण पाटील नवले, अॅड. श्रीनिवास मुसळे, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पोर्णिमा निरांजने आदी प्रांतीय पदाधिकाऱ्यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.