डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प प्रेरणादायी वातावरणात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
त्रिरत्न बौद्ध महासंघ, वर्धा केंद्राच्या वतीने आयोजित तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानमालेचा दुसरा दिवस द्वितीय पुष्प शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२५ रोजी अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. वर्धा शहरातील सुमारे १५०० (पंधराशे) नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहूनही कार्यक्रम शांतता, संयम आणि अनुशासन यांचे उत्तम उदाहरण ठरला.

या द्वितीय पुष्पाचे प्रमुख व्याख्याते धम्मचारी मैत्रेयनाथ यांनी “धम्म : केवळ उपासना नाही, तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे” या विषयावर ओघवत्या, प्रभावी आणि मनाला भिडणाऱ्या शैलीत मार्गदर्शन केले. त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती असलेली निष्ठा व कटिबद्धताच खरी उपासना कशी आहे, हे अत्यंत समर्पक उदाहरणांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धांचा विचार हा केवळ प्रसंगापुरता मर्यादित नसून, तो जीवनाच्या प्रत्येक क्षणी आचरणात आणण्याजोगा ‘बारमाही’ विचार आहे, असे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
दुसरे व्याख्याते डॉ. रोहित पिसाळ (गोल्डमॅन) यांनी आपल्या प्रभावी भाषणातून बौद्ध धम्माचा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रसार करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव मांडताना अस्पृश्यतेच्या वेदनादायी ओळखीपासून मुक्त होत बुद्धधम्म स्वीकारल्याची प्रेरणादायी कहाणी सांगितली. अस्पृश्यांची “पूर्वी गळ्यात मडके ही ओळख होती; आज बुद्धाचे लॉकेट गळ्यात ही माझी ओळख आहे,” या त्यांच्या विचारप्रवर्तक विधानाने उपस्थितांच्या मनात नवी चेतना जागवली.
कार्यक्रमाच्या यशामागे धम्ममित्र व संघ सदस्यांच्या विविध समित्यांचे नियोजन, समन्वय आणि समर्पण महत्त्वाचे ठरले. धम्ममित्रांच्या सर्व समिती सदस्यांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडला.
महार वॉरियर फाउंडेशन, वर्धा यांनी कार्यक्रमासाठी तसेच मुख्य व्याख्यात्यांच्या सुरक्षेसाठी निशुल्क सेवा देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मचारी कुमारजीव यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या आंतरराष्ट्रीय धम्मकार्याचा आढावा घेतला. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दापोली येथील निवासस्थान विकत घेऊन तेथे उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या कार्याची माहिती देत त्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात व्याख्यात्यांचा परिचय धम्मचारी मंजूकीर्ती यांनी करून दिला. सूत्रसंचालन धम्मचारी अनोममित्र यांनी केले. प्रदीप लोखंडे सर यांनी बुद्धगीत व भीमगीत सादर करून वातावरण अधिक भावपूर्ण केले. आभार प्रदर्शन धम्ममित्र विलास आटे सर यांनी मानले.
एकूणच, व्याख्यानमालेचे हे द्वितीय पुष्प केवळ विचारप्रबोधनापुरते मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने प्रेरणा देणारा एक प्रभावी टप्पा ठरला.



