ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल वॉशरीजमुळे होणाऱ्या प्रदूषणावर कठोर कारवाई होणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही

सुधीरभाऊंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिलासा देणार

चांदा ब्लास्ट

बेलसनी परिसरात कोल वॉशरीज प्रदूषणाची पर्यावरण मंत्री यांनी केली पाहणी

चंद्रपूर :_ तालुक्यातील बेलसनी परिसरातील कोल वॉशरीजमुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रदूषण पूर्णपणे कमी करण्यासाठी ठोस आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोल वॉशरीजवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

विधानसभेत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधत ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोल वॉशरीजमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले असून आजच्या पाहणी दौऱ्याद्वारे त्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याचे दिसून आले.

महामाया कोल वॉशरीजमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात काळ्या धुळीचा थर साचून नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, महसूल विभाग व प्रदूषण नियंत्रण विभाग यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे.

या पाहणीदरम्यान बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आज माझ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता करण्यात आली असली, तरी ही तात्पुरती उपाययोजना असून पुढील भेटीदरम्यान प्रदूषणात लक्षणीय घट झालेली दिसली पाहिजे. यासाठी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे.”

दरम्यान, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना सांगितले की, संयुक्त समितीच्या अहवालात सुमारे ६० ते ६५ टक्के नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले असून त्या अनुषंगाने नुकसानभरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे धनादेश मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित गती दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.“पंकजाताई या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालतील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील, असा आम्हाला विश्वास आहे. सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.या दौऱ्या दरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प पुलकित सिंह, भाजप नेते राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, विक्की लाडसे, विजय आगरे,भारत रोहणे, बापूजी भोंगळे, पराग तूराणकर, शोभा पिदुरकर, तानेबाई वाघमारे सरपंच म्हातारदेवी आदींची उपस्थिती होती

या पाहणी दौऱ्यामुळे बेलसनी परिसरातील प्रदूषणाच्या प्रश्नाला नवी दिशा मिळणार असून, लवकरच ठोस उपाययोजना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये