प्रतिकूलतेवर मात करत रूपाली टेकाम पोलीस दलात कवठाळ्यात भव्य सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती : – जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने कवठाळ्यासारख्या खेड्यातील गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थिनी रूपाली टेकाम हिने पोलीस दलात यश मिळविले आहे. युगचेतना ग्रामविकास बहूद्देशीय संस्था संचलित
प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचंदूर यांच्या वतीने नागपूर ग्रामीण पोलीस दलात निवड झालेल्या कुमारी रूपाली अनिल टेकाम यांचा सत्कार समारंभ ११ एप्रिल २०२६ रोजी मौजे कवठाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आदिवासी समाजातील आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या कुमारी रूपाली टेकाम यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात स्थान मिळवले असून त्यांचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत प्रा.राजकुमार मुसने यांनी व्यक्त केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य कलावंत, कवी श्री. शंकर लोडे उपस्थित होते. कवठाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपालीताई बोबडे, माजी पंचायत समिती सभापती मदनजी सातपुते, प्रा.मसे, आस्कार, सेनि.श्री. आगलावे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश ठाकरे, सत्कारमूर्ती रूपाली ते काम तिचे आई वडील पूजा आणि अनिल टेकाम,आनंदराव टेकाम, इस्रो दर्शन चमूत निवड झालेली ओवी सातपुते, प्रमुख मार्गदर्शक विजय अकॅडमी, चंद्रपूरचे संचालक मा. दत्ता बारगिरे, प्रेरणा कॉलेजचे रमेश राठोड, प्रा.चेतना चव्हाण, प्रा.धनश्री चिताडे, अरविंद मुसणे, प्रा.छाया गायकवाड, अर्चना मुत्यलवार सर्व महाविद्यालयातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रूपाली टेकाम व तिची आई वडिलांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. इस्रो येथे पाहणी करण्यासाठी निवड झालेली गावातील कन्या ओवी नरेश सातपुते हिचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना विजय अकॅडमी चे संचालक मा.दत्ता बारगिरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी कुमारी रूपाली टेकाम यांच्या यशाचा उल्लेख करत, “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. सत्कार समारंभ केवळ एका यशाचा गौरव नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .धनश्री चिताडे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.छाया गायकवाड हिने मानले.



