योग्य वयात युवक युवतींचे विवाह झाल्यास जैन समाजासमोर समस्या उभ्या राहणार नाहीत _ दीपक चोपडा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय जैन संघटनेची राष्ट्रीय संवाद यात्रेचे अकोला येथे दिनांक 20 मार्च 26 रोजी शेकडो बीजेएस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले. तर ओसवाल भवन मध्ये पार पडलेल्या विदर्भ विभागीय कार्यकर्ता संवाद दरम्यान उपस्थिताना मार्गदर्शन करताना बीजेएसचे राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी सांगितले की जैन समाजामध्ये विवाहयोग्य युवक युवतींचे विवाह योग्य वेळी होत नसल्याने भविष्यात त्या त्या परिवारामध्ये पारिवारिक समस्यांचा डोंगर उभा राहत आहे हे जर टाळायचे असेल तर योग्य वयात युवक युवतींचे विवाह त्या त्या पालकांनी करून दिल्यास जैन समाजासमोर समस्या उभ्या राहणार नाही असे प्रतिपादन केले. याप्रसंगी बीजेएस चे राज्य अध्यक्ष केतन शाह व महासचिव प्रवीण पारख यांनी सुद्धा उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले.
याबाबत सविस्तर असे की बीजेएस च्या राष्ट्रीय व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी भारतातील १३ राज्यात राष्ट्रीय संवाद यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी सकल जैन समाज वास्तव्यास आहे त्या त्या भागात जाऊन बीजेएस च्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक व इतर कार्याची माहिती देण्याचे काम सुरू केलेले आहे दिनांक 20 मार्च 26 रोजी विदर्भाच्या प्रवेशद्वारावर अकोला येथे बुलढाणा,वाशिम व अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत संवाद साधत त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा व राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार तेरा राज्यात विविध चाप्टरच्या माध्यमातून फाउंडेशन प्रोग्रामचे ठीक ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे या सोबतच युवती सक्षमीकरण यामध्ये वय 14 ते 18 मधील युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष ट्रेनर कडून तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे राज्यात पाणीटंचाई पाहता संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबविणे चे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मूल्यवर्धन शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व महत्त्वाचे म्हणजे जैन समाजातील विवाह योग्य युवक युवतींचे विवाह प्रॉपर वेळेला होत नसल्याने अनेक परिवारामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहे.
दोन्ही परिवाराकडून अपेक्षांचे गाठोडे उघडल्या जात असल्याने युवक युवतींचे वय वाढत चालले आहे याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याचे सूचविण्यात येऊन बीजेएस च्या वतीने आता जिल्हा सर्व विभाग स्तरावर विवाह योग्य उच्चशिक्षित युवक युतीसाठी *परिणय पथ* या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात येत आहे यामध्ये संघटनेला यश येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्याध्यक्ष केतनभाई शहा, महासचिव प्रवीण पारख, विदर्भ अध्यक्ष कीर्ती कुमार वायकोस, राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन, प्रा. सुभाष गादिया, विमल जैन, निलेश गोठी, ममता जैन, बीजेएस माजी अध्यक्षा प्रेरणा शाह सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.



