स्वाभिमान आणि शौर्याचा शिवसंदेश घराघरांत पोहोचवू या _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आवाहन
आ. मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या समता, ममता आणि लोककल्याणाच्या विचारांना दिली उजळणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण अभिवादन
चंद्रपूर : शिवरायांचा विचार हा केवळ इतिहासापुरता मर्यादित नसून, समाजाला स्वाभिमान, धैर्य आणि लोककल्याणाची दिशा देणारा आहे. “मरण आलं तरी चालेल, पण शरण जाणार नाही” हा त्यांचा स्वाभिमान आणि शौर्याचा संदेश प्रत्येकाच्या मनामनात रुजवणे, हीच खरी शिवजयंती असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात आयोजित शिवजयंती अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चौक भगव्या पताकांनी सजला होता. ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांत वातावरण भारावून गेले. शिवरायांच्या वेशभूषेत सजलेल्या लहान मुलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी,चंद्रपूरचे महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, माजी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते राजेंद्र गांधी, महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, ब्रीजभूषन पाझारे,चांद पाशा,विजयजी राऊत,जहीर खान कादरी आदींची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला हा सिंह केवळ तलवारीच्या बळावर नव्हे, तर समता, ममता, बंधुत्व आणि मानवतेच्या मूल्यांवर उभा राहिला. अन्यायाविरुद्ध उभे राहून रयतेचा सेवक म्हणून राज्य करणारे जाणते राजे म्हणजे शिवराय. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आदर्श राज्यकर्ते होते.’
शिवरायांच्या पराक्रमामागे जिजाऊंचे मातृत्व आणि संस्कारांची भक्कम पायाभरणी होती. सिंदखेडराजा येथे जिजाऊ स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देत त्यांनी शिवकार्य जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखित केला. जय भवानी, जय शिवाजी हा आमच्यासाठी केवळ नारा नाही, तर ऊर्जा, शक्ती आणि समाजासाठी जगण्याचा संकल्प आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेस चांदीचे छत्र अर्पण करण्याचे भाग्य लाभले, श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांच्या ध्यानस्थळी मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली आणि लंडनहून शिवरायांचे वाघनखं भारतात आणण्यासाठी पुढाकार घेता आला, ही बाब आपल्या आयुष्यातील अभिमानाची आणि प्रेरणादायी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.



