भद्रावती मुख्य बाजार व हनुमान नगर रोडवर जड वाहतुकीस बंदीची मागणी
निवेदनाद्वारे इम्रान खान यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच हनुमान नगर रोड ( जुने वडाचे झाड परिसर ) येथे गर्दीच्या वेळेत सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला असल्याके समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाने प्रशासनाकडे औपचारिक निवेदन देत जड वाहनांच्या प्रवेशावर वेळेचे निर्बंध लावण्याची मागणी केली आहे.
याशिवाय भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी मा. तहसीलदार, भद्रावती यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड हा शहरातील सर्वाधिक व्यावसायिक परिसर असून दिवसभर हजारो नागरिकांची वर्दळ असते. अशा वेळी हायवा, दहा चक्का यांसारखी जड वाहने गर्दीच्या वेळेत शहरातून जात असल्याने रस्त्यावर ताण निर्माण होत आहे.
स्थानिक व्यापारी व नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या असूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही, असे निवेदनात नमूद आहे.
विशेषतः सकाळ व संध्याकाळच्या वेळेत विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असतात. या वेळी जड वाहनांची ये-जा अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या प्रवेशास तात्काळ बंदी घालावी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त वाढवावा, या विषयावर तातडीची बैठक घेऊन ठोस निर्णय जाहीर करावा, दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा.
दरम्यान, इतर शहरांमध्ये गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर वेळेचे निर्बंध लागू केल्याचे उदाहरण देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर भद्रावतीतही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजयुमोच्या वतीने देण्यात आला आहे.



