के.पी.सी.एल कंपनीच्या कोळशा वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार
उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील बरांज परिसरात के. पी.सी.एल कंपनी कोळशा उत्खनन करून तो थेट कर्नाटकात पोहोचवल्या जातो. सदर उत्खनन क्षेत्र ते रेल्वे सायडिंग च्या दरम्यान कोंढा, कढोली, किलोनी गावे व गावातील शेतशीवार येतात. सततच्या अवजड वाहतुकीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झालेली असून या वाहतुकीचा थेट दुष्परिणाम उभ्या पिकावर पडून शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच रोड लगतच्या गावांना व घरांना हादरे बसून घरांचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे. घरादारासह अन्नावर सुद्धा धूळ बसत असल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या उग्र रूप धारण करीत असून, दमा, खोकला, त्वचा रोग यामुळे ग्रामस्थांना जीव नकोसा होत आहे.
परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी अनेकदा कंपनी व प्रशासनास निवेदने देऊन यावर प्रतिबंध व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासनासह कंपनीने सुद्धा ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचा च प्रकार अवलंबला.
या सर्व दुर्लक्षित व अन्यायकारक प्रकाराला कंटाळून आज दिनांक.२ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना अनिल प्रफुल थेरे तालुका अध्यक्ष युवा आघाडी यांचे नेतृत्वात मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
पूर्वीप्रमाणे यावेळी निवेदनाची दहा दिवसात दखल घेऊन नुकसान भरपाई देण्यास कार्यवाही न केल्यास कंपनी परिसरात उग्र आंदोलन करून अवजड अश्या कोळसा वाहतुकीस ग्रामपंचायत क्षेत्रातून जाण्यास मज्जाव केला जाईल.
निवेदन सादर करतेवेळी शैलेश गोंडे, नंदू गोंडे, नरेंद्र नागपुरे, प्रदीप डोंगे, विलास राजूरकर, राजेश मत्ते, रोशन घोरपडे, स्वप्नील डाहुले, बंडू मत्ते, विवेक मत्ते, मिथुन गोंडे, शंकर थेरे, किसन थेरे, सुहास चिकटे, गणेश जीवतोडे, स्वप्नील क्षीरसागर आदी उपस्थित होते.



