विकसीत भारत @2047 अंतर्गत जिल्हा विकास आराखडा – सात समित्यांचे गठण
समित्यांच्या गटप्रमुखांनी संबंधित विभागाशी चर्चा करून आराखडा तयार करावा - जिल्हाधिकारी
चांदा ब्लास्ट
विकसीत भारत @ 2047 अंतर्गत जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी सात समित्यांचे गठण करण्यात आले असून समिती प्रमुखांनी विविध विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून संबंधित विषयाचा विकास आराखडा त्वरीत सादर करावा, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास आराखड्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, समित्यांच्या गटप्रमुखांनी संबंधित विभागाशी चर्चा करून आराखडा तयार करावा. प्रत्येक समितीने आराखड्याचे सादरीकरण करावे. आराखड्यामध्ये भविष्यकालीन उपाययोजनांबाबत काय करणार आहोत, ते नमुद असावे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, जलसंपदा यांनी एकत्रितरित्या आराखडा तयार करावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. विकसीत भारत @ 2047 अंतर्गत सन 2022-27, सन 2027-37 आणि सन 2037-47 या वर्षांचा जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करायचा आहे.
यासाठी कृषी संलग्न सेवा, खनीकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभुत सुविधा, सामान्य सेवा आणि प्रदुषण नियंत्रण व्यवस्थापन या विषयांवर समित्यांचे गठण करण्यात आले आहे.