ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरपट्ट्यांपासून वीजदर कपात पर्यंत सर्व वचने पूर्ण करू – ना. चंद्रशेखर बावणकुळे

भाजपा चंद्रपूर महानगरतर्फे जैन भवन येथे कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम आणि जनतेच्या विश्वासामुळेच महाराष्ट्रात विकासाचे सरकार स्थापन झाले. आपल्या एका मताने विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी सर्व निवडणुकांत विजय मिळवून कमळ फुलवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार घरपट्ट्यांपासून वीजदर कपातीपर्यंत सर्व वचने पूर्ण करणार असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले.

 भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे जैन भवन येथे कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुधाकर कोहळे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्य वर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, महामंत्री रवी गुरुनुळे, श्याम कनकम, मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महिला अध्यक्ष वंदना हजारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, विनोद खेवले, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे यांच्यासह माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती.

 बावणकुळे म्हणाले की, तीन कोटी सतर लाख मतांची ताकद घेऊन आणि ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. हे यश इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही शक्य झाले नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण ते घडवून आणले.”

ते पुढे म्हणाले की, या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शेतकऱ्यांकडून वीजबिल न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेता आला. घरपट्ट्यांसह ३६ महत्त्वाच्या विषयांवर निर्णय झाले असून ५० हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार आहेत. विजेचे दर कमी करून साडे पाच रुपये प्रति युनिट एवढीच वसुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वात विकसित राज्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत बावणकुळे म्हणाले की, “नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका आपण जिंकल्या पाहिजेत. आपले सरकार हे वचनपूर्ती करणारे, विकासाच्या माध्यमातून काम करणारे सरकार आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काच्या एका टक्यालाही कुणाचा हात लागणार नाही. प्रत्येक समाजाला समान न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. चंद्रपूरातील प्रत्येक घराला आखीव प्रपत्रिका देण्यात येणार असून गरिबांना घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचवल्या पाहिजेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात उत्तम कार्यकारिणी तयार झाली आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यक्षम आहे. जोरगेवार यांचे नेतृत्व आणि हंसराज अहिर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे. मतदारसंघातील कामे करण्यासाठी जोरगेवार यांची धडपड आम्ही पाहिली आहे. उत्तम काम करणाऱ्या दहा आमदारांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या कामामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून मुख्यमंत्री त्यांना कधीच खाली हाताने पाठवत नाहीत. त्यामुळे आपल्या प्रभागातील परिसरातील कामे आपण करून घ्यावीत, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ मंत्रीमंडळ कार्यरत आहे. नागरिकांना घरे देण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा असून यामुळे नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. या सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळत आहे.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, घरपट्ट्याच्या मागणीसंदर्भात मंत्री बावणकुळे यांनी तात्काळ मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला. सत्तेचा लाभ शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.चंद्रपूरमध्ये आयोजित माता महाकाली महोत्सवादरम्यान निघणारी पालखी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी असून या मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत असून चंद्रपूर मतदारसंघाचाही विकास होत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यकर्ता मेळाव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकांत विजयाची पताका फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये