घरात येऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्यांची पोलिसांकडून पाठराखण
पीडित कुटुंबीयांचा पत्रपरिषदेत आरोप : न्याय न मिळाल्यास उपोषण करणार
चांदा ब्लास्ट :
चंद्रपूर : क्षुल्लक वादातून घरात येऊन प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार मूल पोलीस ठाण्यात दिली. परंतु, पोलिसांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे गुन्हा नोंदविला नाही. शिवाय, स्पॉट पंचनामा केला नाही. मारहाण करणाऱ्यांना सरक्षण देण्याचा हा प्रकार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच मारहाण करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून कुटुंबीयांना संरक्षण द्यावे अशी मागणी चिखली येथील गेडेकर कुटुंबीयांनी चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मूल तालुक्यातील चिखली येथील दामोधर गेडेकर यांच्या घरासमोर प्रमोद कडस्कर आणि विनोद कडस्कर यांचे घर आहे. कडस्कर कुटुंबीय कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद उकरून काढतात. घरासमोरील येण्याजाण्याच्या रस्त्यावर धुणीभांडी करून वाद निर्माण करतात. १५ मे रोजी कडस्कर कुटुंबातील सदस्यांनी स्वत:हून वाद उकरून काढत घरात येऊन सबल आणि काठीने मारहाण केली. यात माझ्यासह मुलगा आणि पत्नीलाही जबर मार लागला असून, तशी तक्रार मूल पोलीस ठाण्यात दिली. परंतु, पोलिसांनी केवळ नाममात्र गुन्हे दाखल केले असा आरोप दामोधर गेडेकर यांनी केला आहे. तक्रारीप्रमाणे गुन्हे दाखल केले नाही, स्पॉट पंचनामा केला नाही असा आरोप गेडेकर यांनी केला. कडस्कर कुटुंबीयांकडून आमच्या कुटुंबाला धोका असून, संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केले.
मूल येथील पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे चौकशीसाठी चिखली येथे आले होते. यावेळी त्यांनी येण्याजाण्याचा खर्च म्हणून पाच हजार रुपये मागितले परंतु, आपण पैसे देण्यास नकार दिल्याने द्वेषभावनेने त्यांनी तपास करून मारहाण करणाऱ्या कडस्कर कुटुंबातील सदस्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोपही गेडेकर यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना याबाबची तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षकांना मूल येथील ठाणेदारंाना फोन करून उचित कारवाईचे आदेश दिले. माल, मूल पोलीस कडस्कर कुटुंबीयांना या प्रकरणातून वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप दामोधर गेडेकर यांनी केला. यावेळी त्यांची पत्नी शीला गेडेकर, मुलगा उपस्थित होते.