दारुड्या चालकामुळे झाला त्या 25 प्रवाशांचा कोळसा – समृद्धी अपघात प्रकरणी मोठा खुलासा
वैद्यकीय अहवालातून आले सत्य बाहेर
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
शुक्रवार दिनांक 30 जुन च्या मध्यरात्री म्हणजेच जुलै रोजी 1:30 वाजताच्या दरम्यान नागपुर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मृत्यु तांडव घडले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावानजीक नागपुर येथुन पुण्याला जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्स उलटून बसला लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला.
सदर बसचा टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन उलटली व बसला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे अपघातातून सुखरूप बचावलेल्या चालकाने सांगितले होते. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले व अपघात नेमका कसा झाला ह्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंत्रणांना प्राप्त माहितीनुसार त्या ट्रॅव्हल्सचे चाक आधी फुटले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन अपघातापुर्वी ही बस रस्ता दुभाजकला धडकली व त्यानंतर बस उलटली व डिझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याने निष्पन्न झाले.
मात्र नुकत्याच प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठवले होते, त्याचे निष्कर्ष समोर आले असुन संबंधित चालक शेख दानिश मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता. दारूचा अंमल जास्त झाल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकावर आदळून हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असल्याचे कळले आहे. प्रयोगशाळेने दिलेल्या रक्त चाचणीच्या निष्कर्षानुसार चालक शेख दानिश ह्यांच्या रक्तात 30% पेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक बघता हे प्रमाण फार जास्त असुन शेख दानिश ह्याच्या रक्ताचे नमुने अपघात झाल्यानंतर काही तासांनी घेण्यात आले होते. दरम्यानच्या वेळात त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कमी झाले असेल मात्र नेमका अपघात झाला त्यावेळी त्याच्या रक्तात 30 टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात अल्कोहोल असण्याची शक्यता असुन ह्या अपघाताला दारुडा चालकच जबाबदार असल्याचे दिसत आहे.