घुग्घुसमध्ये देशी दारू दुकानाविरोधात बसपाचे धरणे आंदोलन
महिलांचा संताप, प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल

चांदा ब्लास्ट
घुग्घुस : येथील गांधी चौकात बुधवारी (६ ऑगस्ट) दुपारी १ वाजता बहुजन समाज पार्टीतर्फे घुग्घुसमधील दोन देशी दारू दुकानांविरोधात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलक महिलांनी देशी दारू दुकानांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्रासाविरुद्ध संताप व्यक्त करत, दुकान दर रविवारी बंद ठेवण्याची जोरदार मागणी केली.
सदर धरणे आंदोलनादरम्यान घुग्घुस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल डाहुले यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी डाहुले यांनी निवेदन संबंधित विभागाकडे पाठवून समस्येवर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनाचे नेतृत्व करताना बसपाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला यांनी सांगितले की, “दर रविवारी दोन्ही देशी दारूचे दुकाने बंद न केल्यास शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
शहरात एक देशी दारू दुकान सिमेंटनगर रस्त्यालगत तर दुसरे तलावाजवळ आहे. रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात महिला मोठ्या संख्येने येतात. परंतु देशी दारू दुकानांपाशी मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती अश्लील वर्तन करतात, महिलांना धक्के लागतात, आणि सार्वजनिक शौचालयाजवळ अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
यावेळी बसपाचे अध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, साहिल गोंगले, यश साळवे, सुजल बनकर, हंसिक कांबळे, प्रणित कोंडागुर्ला, शरद अवताडे, संजय आगदारी, शोभराणी गोडपल्लीवार, सुषमा उईके, जया आगदारी, लक्ष्मी आगदारी, सरिता दुर्गे, रेखा पांडे, भारती आगदारी, प्रियंका चौधरी, नंदा मडकम, राणी मडकम, रेश्मा इंगोले, संगीता सूर्यवंशी, लता कोंडागुर्ला, पार्वती सिडाम व यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.
प्रशासनावर गंभीर आरोप
ध्यानाकर्षणासारखे म्हणजे, संबंधित विभागास अनेक वेळा निवेदन दिले असतानाही प्रशासनाकडून वेळेत ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट अधिकाऱ्यांनी आंदोलन होईपर्यंत दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात चर्चेनुसार अधिकारी त्यांच्या कर्तव्यांपासून दूर असून, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. यातील एका देशी दारू दुकानाच्या परिसरात याआधी गंभीर घटना घडल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, प्रशासन केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत असून, प्रत्यक्षात काहीही घडत नसल्याने हे प्रकरण आता अधिक गाजू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर घुग्घुसमधील नागरिक, विशेषतः महिलांनी प्रशासनाच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित केले असून, योग्य कारवाई न झाल्यास संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.