ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे अन्नदात्याच्या कष्टांचा गौरव – आ. किशोर जोरगेवार

देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्यात महिला शेतकऱ्यांचा सत्कार; शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खत व कृषी किटचे वितरण

चांदा ब्लास्ट

शेतीच्या विकासात महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा आधार आहेत. त्यांच्या कष्टांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून, महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने, तंत्रज्ञान आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा यांच्या वतीने पडोली येथे आयोजित देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्यात महिला शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महिलांना शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खत तसेच कृषी किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी अर्चना डेहणकर, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर महामंत्री नामदेव डाहुले, सविता दंडारे, महिला महानगर प्रभारी वंदना हातगावकर, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष कौसर खान, सुमित बेले, दुर्गा बावणे, नीलिमा वनकर, अनिता झाडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला शेतकरी, ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, महिला शेतकरी केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नाहीत, तर शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कष्टामुळे शेती समृद्ध होत असून, त्यांना सक्षम करण्यासाठी शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिला शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी दर्जेदार बियाणे, संतुलित खतांचा वापर आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक आहे. उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती अधिक फायदेशीर व्हावी आणि ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. महिला शेतकरी स्वयंपूर्ण झाल्यास संपूर्ण कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर उपस्थित महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त बियाणे, खत तसेच कृषी किटचे वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये