डिजिटल माध्यमांचा ग्रामीण शिक्षणात समावेश होणे काळाची गरज _ पुलकित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी
बाखर्डी ग्रामपंचायतला भेट ; स्मशानभूमीत ऑक्सिजन पार्कची भुरळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डिजिटल माध्यमांचा ग्रामीण शिक्षणात समावेश करणे एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात समान संधी मिळतील व जिल्हा परिषदच्या शाळा मोडकळीस येणार नाही असे मत कोरपना तालुक्यातील नव्याने आदर्श ठरलेल्या बाखर्डी ग्रामपंचायतला जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी गुरुवारला भेट दिली त्यावेळी मत व्यक्त करून सखोल पाहणी व प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी अरुण रागीट सरपंच बाखर्डी, विजय पेंदाम गटविकास अधिकारी कोरपना, ऋषिकेश होळकर सहाय्यक गट विकास अधिकारी, पवन कातकर ग्रामपंचायत अधिकारी इतर संबंधित विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
नव्याने उभारण्यात आलेल्या डिजिटल शाळा व मॉडल स्कूल प्रकल्पाचे निरीक्षण केले.ओसाड पडलेल्या स्मशानभूमीत 1 हजार 200 फळझाडांची लागवड करून निसर्गनिर्मित ऑक्सिजन पार्क पाहून समाधान व आनंद मिळाल्याने या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले व ते इतर ग्रामपंचायतींसाठी अनुकरणीय ठरावे, असे गौरवोद्गार काढले.
डिजिटल शाळा व मॉडल स्कूल ऑक्सिजन पार्क, गांडूळ खत प्रकल्प, नाडेप खत खड्डे या जैविक व पर्यावरणपूरक योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व शाश्वत शेती या दृष्टीने बाखर्डी ग्रामपंचायत हे प्रेरणास्थान ठरत आहे, असे प्रतिपादन केले.
भेटीच्या शेवटी सिंग यांनी उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधत सुरू असलेल्या विकासकामांची अंमलबजावणी, प्रगती व अडचणींचा आढावा घेतला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आणि लोकसहभागावर आधारित कार्यपद्धती राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
“गावांचा विकास हा फक्त योजना आणण्यात नव्हे, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीत आहे. बाखर्डी ग्रामपंचायतने हा आदर्श निर्माण केला आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
ही भेट ग्रामपंचायत बाखर्डी व प्रशासन यांच्यातील समन्वयाची आणि सुशासनाच्या वाटचालीची ठोस पावले अधोरेखित करणारी ठरली असून, गाव विकासाच्या दृष्टीने ही एक प्रेरणादायी पायरी ठरली आहे.
बाखर्डी गावं आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे यामध्ये स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या महत्वाच्या बाबींवर भर देत आहों गावकऱ्यांच्या एकजुटीतून व सहकार्यातून हे शक्य होत आहे.
अरुण रागीट
सरपंच ग्रामपंचायत बाखर्डी