वृक्ष लागवड महत्त्वाची नसून वृक्ष संगोपन काळाची गरज _ सतिश कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पर्यावरणाला गृहित धरण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा सर्व सजीव सृष्टीवर विघातक परिणाम होत आहे.यातूनच पर्यावरणा बाबतच्या जागृतीची गरज निर्माण झाली.म्हणूनच 1972 साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या विषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सामाजिक, राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात आला. असे प्रतिपादन समर्थ कृषी महाविद्यालय चे सचिव सतिश कायंदे यांनी दिनांक 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिवस निमीत्ताने भारतीय जैन संघटना व समर्थ कृषी महाविद्यालय चे संयुक्तं विद्यमाने आयोजीत कार्यशाळेत केले. यावेळी बी जे एस चे सन्मती जैन व पियूष खडकपूरकर, प्रा. सचिन सोळंकी उपस्थीत होते.
संपूर्ण जगात पर्यावरण साक्षरता वाढीस लागून आपला मूलाधार असलेले पर्यावरण सुरक्षित राहावे यासाठी वसुंधरेवरील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन संकल्प,वृक्षारोपण,वृक्ष संगोपन तथा इतर पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा होणे काळाची गरज झालेली आहे.असे जरी असले तरी फक्त जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण पूरक उपक्रम राबवायचे आणि वर्षभर पर्यावरणाकडे दुर्लक्ष करायचे असे होता कामा नये.म्हणूनच पर्यावरण संवर्धनाचे काम सातत्यपूर्ण होणे नितांत गरजेचे आहे. तरच पर्यावरणाचा समतोल कायम ठेवता येईल व मानव जातीचे भविष्य उज्वल करता येईल.
पर्यावरण प्रेमी, शासन,प्रशासन,सामाजिक कार्यकर्ते,विविध सेवाभावी संस्था व संघटणे आपापल्या परीने पर्यावरण संवर्धन करीत असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी होऊन उचित योगदान दिल्यास पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोक चळवळ होईल.असा विश्वास वाटतो.
पर्यावरणाबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेतुन प्रत्येकाने राष्ट्रीय सण – उत्सव,थोरा मोठ्यांची जयंती – पुण्यतिथी, वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, मैत्रीचे प्रतीक,प्रेमाचे प्रतीक, जीवनातील सोनेरी क्षण तथा कुटुंबातील मयत व्यक्तीच्या स्मृती निमित्ताने उचित ठिकाणी देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्या जातील व त्याचे संगोपन झाल्याने काही प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यात यश मिळेल. असाही सूर या कार्यशाळेतून निघाला