ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन – गोविंद भाऊराव पेदेवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

         पर्यावरण म्हणजे सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती होय. यामध्ये हवा, पाणी,माती, वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. पर्यावरण हा मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. आदी -अनादी काळापासून पर्यावरण आणि मानव यांचे नाते घनिष्ठ व अतूट आहे. पर्यावरण हा मानवाचा खरा मित्र राहिलेला आहे; पण मानवच आपल्या खऱ्या मित्राला धोका देत आहे. खऱ्या मित्राला काळाच्या ओघात विसरत चालला आहे. आपल्या स्वार्थासाठी खऱ्या मित्राच्या अस्तित्वावर घाव घालण्यास थोडाही संकोच दिसून येत नाही.

        आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या बळावर संस्कृतीची उभारणी करणारा आणि प्रचंड प्रगतीची उडान भरणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव…! आधुनिक काळात एकीकडे मानवाने प्रगतीची उत्तुंग शिखरे सर केली. दुसरीकडे नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरण विषयक समस्या निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक समाज जाणीवा जागृत होऊ लागल्या. पर्यावरणीय घटक मुख्य स्वरूपाने पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी,झाडे ,भूमी, चंद्र, सूर्य, आकाश, समुद्र, इत्यादी असून;सर्व घटक मिळून जो व्यापक स्वरूपामध्ये समुदाय बनतो त्याला निसर्ग किंवा पर्यावरण म्हणतात. पर्यावरणातून अन्न, वस्त्र, निवारा प्राणवायू(ऑक्सीजन), औषधी वस्तू …अशा कितीतरी मूलभूत व भौतिक गरजांच्या वस्तू भरपूर प्रमाणात प्राप्त होत असतात.

          मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनाचा वापर करून आपले जीवनमान उंचावले आहे. रस्ते, राहण्यासाठी घरे,शेती, धरणे अशा अनेक घटकांची निर्मिती केली. या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसून येते. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा ऱ्हास व त्याची सजीव सृष्टी यावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम होतो.

आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून अर्थातच निसर्गातून होत असते. हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या याच स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेले आहे.याबाबत वेळीच जागरूकता न झाल्यास येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल,यामध्ये कोणतेही दुमत नाही.

    “पर्यावरण रक्षणाची धरा कास, तरच होईल मानवाचा विकास”

         मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे, हे विसरता कामा नये. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.हे आपण ओळखले पाहिजे.व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे.व इतरांनाही प्रोत्साहित करावे.

       पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा !! देश वाचवा!! या उक्ती प्रमाणे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये