ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठवणींचा गंध दरवळला

भद्रावतीत वर्गमित्रांच्या स्नेहमिलनाने जुळले सूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         काळाच्या ओघात विखुरलेल्या मैत्रीच्या धाग्यांना पुन्हा एकदा एकत्र गुंफण्याचा अनुपम सोहळा दि.25 मे रोजी भद्रावती येथील गुरुदेव लॉन, बगडे वाडी येथे संपन्न झाला.जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथील सन 1990-91 च्या 10 वितील वर्गमित्रांच्या तब्बल 34 वर्षांनी “पुन्हा उजळल्या त्या आठवणी” असे मार्मिक शीर्षक घेऊन आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्याने उपस्थित प्रत्येकाच्या मनात जुन्या दिवसांच्या आठवणींना पुन्हा पालवी फुटली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना आशिष ठेंगणे यांनी शालेय जीवनातील अनेक किस्से कथन करत उपस्थितांना हास्याच्या आणि स्मृतींच्या लाटांवर स्वार केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाने वातावरणात एक घरंदाजपणा आला. व्यासपीठावर धम्मपाल पेटकर, दिलीप विरुटकर, अनिता बिजोरे, विजय मुडपल्लीवर, शेटे, जगताप, गोपाल शिरपूरकर आणि किशोर खंडाळकर या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

            प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षणांना उजाळा देत, जुन्या मैत्रीच्या नात्यांची उब पुन्हा अनुभवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला शेटे यांनी अत्यंत ओघवत्या आणि काव्यमय शैलीत केले. त्यांच्या शब्दांनी कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. बालपणीच्या गप्पा, खोड्या, अभ्यासाचे ताण आणि भविष्याची स्वप्ने या सर्वांना या सोहळ्यात नव्याने उजाळा मिळाला. एकमेकांना भेटून जुने वर्गमित्र भारावून गेले होते. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

या स्नेहमेळाव्यामुळे केवळ जुन्या आठवणीच ताज्या झाल्या नाहीत, तर मैत्रीच्या चिरंतन नात्याची महती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भद्रावतीच्या सुभाष बांदूरकर,सुनीता खंडाळकर,विना जुनघरे,राजेश बदखल,विनोद लोहकरे,संजय कोमेजवार, गणेश बोबडे,रमण राखुंडे,संतोष कोंगरे, भास्कर मोघे आदींनी अथक परिश्रम घेतले.काळाच्या ओघात माणसे दूर गेली तरी, त्यांच्यातील मैत्रीचे बीज कधीच सुकत नाही, याची प्रचिती या सोहळ्याने दिली. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो एक भावनिक पूल होता, ज्याने भूतकाळाला वर्तमानाशी जोडून भविष्यासाठी मैत्रीची नवी पालवी निर्माण केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये