देशी दारू दुकानच्या मागील मार्गामुळे महिलांना त्रास – प्रशासन मौन का?

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर): चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस परिसरात कॅप्टन दीक्षित यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या देशी दारू दुकानाच्या मागील बाजूने विक्री सुरू झाल्यापासून स्थानिक नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोज दुकानाच्या मागे आणि समोर भांडणे, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना घडत असून त्यामुळे शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर धोका निर्माण झाला आहे. आज दिनांक ०६ जून २०२५ रोजी या ठिकाणी दुवादार तांडव पाहायला मिळाले, ज्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्थानिक नागरिक व माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर यांनी सांगितले की, या दुकानाचा मागचा दरवाजा मुद्दाम उघडण्यात आला असून त्याद्वारे बेकायदेशीररीत्या देशी दारू विकली जात आहे. हा रस्ता थेट हिंदू धर्मस्थळ – भगवान शंकराच्या मंदिरासमोरून जातो, जे स्थानिकांची श्रद्धा व आस्था यांचे केंद्र आहे. याच रस्त्याच्या समोर नगर परिषदेकडील सार्वजनिक शौचालय आहे, ज्याचा वापर दररोज गरीब व श्रमिक महिलांकडून होतो.
बांदुरकर यांनी सांगितले की, मद्यधुंद लोक या शौचालयासमोरील पायऱ्यांवर बसून राहतात, त्यामुळे महिलांना अत्यंत भीती आणि त्रास सहन करावा लागतो. महिलांची मानसिक आणि सामाजिक हानी होत असून अनेक महिलांनी शौचासाठी बाहेर जाणेच बंद केले आहे. हे चित्र समाजासाठी लज्जास्पद आहे.
दिनांक ०४ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक नागरिकांनी या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन दिले होते. मात्र, फक्त औपचारिक कारवाई झाली असून प्रत्यक्षात कोणताही फरक पडलेला नाही. नगर परिषद कार्यालयातही वारंवार निवेदने दिली गेली, परंतु कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई झाली नाही.
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य तेव्हा वाढले, जेव्हा याच परिसरात झालेल्या भांडणात एका युवकाचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद आणि चिंताजनक घटना आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक शौचालयाची तोडफोड करण्यात आली असून त्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडत चालली आहे.
अशा परिस्थितीतही प्रशासनाचे मौन आश्चर्यकारक आणि संतापजनक आहे. हे मौन भविष्यातील आणखी गंभीर घटनांना निमंत्रण देणारे आहे. नागरिकांची ठाम मागणी आहे की, कॅप्टन दीक्षित यांच्या देशी दारू दुकानाच्या मागील दरवाज्याची विक्री त्वरित बंद करण्यात यावी आणि बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर यांनी या संदर्भातील व्हिडीओ पुरावेही प्रशासनाला सादर केले आहेत आणि त्वरित कृतीची मागणी केली आहे. आता पाहायचं हे की प्रशासन जागं होतं का, की पुढील एखाद्या दुःखद घटनेची वाट बघत बसतं?