ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नदीत टाकलेला मलबा आणि राफ्टर पूल ठरत आहे जीवघेणा

नदी प्रवाह रोखल्याबाबत WCL विरुद्ध कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : दिनांक ६ जून २०२५ रोजी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) कंपनीने वर्धा नदीवर उभारलेल्या राफ्टर पुलामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची आणि नागरिकांचे प्राण व मालमत्ता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुधाकर गणपत बांदुरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डिसेंबर २०२३ मध्ये मुंगोली-घुग्घुस मार्गावरील जुन्या खराब झालेल्या पुलाच्या जागी WCL कंपनीने पर्यायी व्यवस्था म्हणून राफ्टर पूल तयार केला. हा पूल उभा ठेवण्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात माती टाकण्यात आली असून, काही ठिकाणी केवळ मोजक्या होम पाईप्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे रोखला गेला असून, नदीतील पाण्यात माती, कोळशाची धूळ आणि अन्य घाण मिसळल्याने जलप्रदूषणाचा धोका गंभीर स्तरावर पोहोचला आहे.

बांदुरकर यांनी नमूद केले की, यापूर्वी WCL कडून उभारलेला अशाच प्रकारचा राफ्टर पूल अवघ्या काही दिवसांत वाहून गेला होता. तरीही पुन्हा त्याच पद्धतीने अस्थायी पूल बांधून दररोज हजारो टन कोळशाची वाहतूक केली जात आहे, जी कधीही जीवघेणी ठरू शकते. ही संपूर्ण स्थिती जलप्रदूषण नियंत्रण कायदा व पर्यावरण संरक्षण अधिनियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बांदुरकर यांनी त्यांच्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

1. नदीपात्रात टाकलेली माती आणि राफ्टर पूल तात्काळ हटवण्यात यावेत.

2. वर्धा नदीचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यात यावा.

3. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

4. संपूर्ण प्रकरण जलसंपदा विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून सोडवण्यात यावे.

या संदर्भातील प्रत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग व WCL च्या व्यवस्थापकांना देखील देण्यात आली आहे.

घुग्घुस परिसरातील नागरिकांमध्ये या मुद्द्याविषयी तीव्र नाराजी असून, लवकरात लवकर नदी प्रवाह सुरळीत करून पर्यावरणीय आणि मानवी संकट टाळण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये