जिवतीकरांच्या समस्यांवर तातडीने तोडगा
खा. धानोरकर यांच्या जनता दरबारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज, बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी, पंचायत समिती जिवती येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. या दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आपल्या समस्या मांडल्या आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अनेक समस्यांवर तातडीने तोडगा काढल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी ११:०० वाजता सुरू झालेल्या या जनता दरबारात रस्ते, वनहक्क, अनियमित वीजपुरवठा, आरोग्य सेवा यांसारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काही समस्यांवर जागेवरच तोडगा काढण्यात खासदार धानोरकर यांना यश आले. यामध्ये रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाले. तसेच, वीजपुरवठ्यातील अडचणींबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य सेवेतील समस्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.
याव्यतिरिक्त, पाणीटंचाई आणि आरोग्य तसेच महावितरण (MSEDCL) संबंधित समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील १२ गावांच्या सीमा प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण जनता दरबारात काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी माने, तहसीलदार रुपाली मोगरकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावडे, तालुका अध्यक्ष गणपत काळे, माजी नगराध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, नंदाताई मुसने, आरिफ शेख, लक्ष्मीनारायण ढोलके, डॉ. चिंचोळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या यशस्वी जनता दरबाराबद्दल बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आज नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करता आल्याचा मला खूप आनंद आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन.”
या जनता दरबारात स्थानिक प्रशासनातील उच्च अधिकारी, पंचायत समिती सदस्य, विविध गावांतील सरपंच आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या थेट संवाद उपक्रमाचे कौतुक केले आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल समाधान व्यक्त केले.