ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा – आ. किशोर जोरगेवार

वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत दिले निर्देश

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली रामबाग विश्रामगृहात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (भा.प्र.से.) कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक (भा.प्र.से.) श्वेता बोडू, मध्य चांदा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक अदिश शेंडगे, तसेच चंद्रपूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विश्रांत तडसे, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवणे, नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करणे, तसेच स्थानिकांचा सहभाग वाढवणे यावर सखोल चर्चा झाली. बैठकीदरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्ह्यातील नागरिक सतत धास्तीच्या वातावरणात राहू शकत नाहीत. वनविभागाने तातडीने उपाययोजना आखून अंमलात आणाव्यात, तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात असे निर्देश दिले.

यावेळी आ. जोरगेवार म्हणाले, वाघांच्या हलचालींबाबत माहिती देण्यासाठी गावात बातमीदार यंत्रणा सक्रिय करावी, तसेच वनविभागाचे पथक २४ तास सज्ज ठेवले जावे. लोकांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना तत्काळ लागू करून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्यावी.असेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध निर्णय घेण्यात आले असून, वनविभाग आणि स्थानिक प्रशासन परस्पर समन्वयाने काम करणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये