स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पांदनरस्त्यांची कामे करा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांच्याहस्ते पांदन रस्त्यांचे भुमिपुजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जिल्ह्यात 533 शेत पांदनरस्त्यांची कामे मंजूर
मे व जून महिन्यात कामे पुर्ण करण्याच्या सूचना
वर्धा :- शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करायचे असेल तर त्यांना सिंचन, वीज आणि उत्तम पांदनरस्ते देणे फार आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासन यासाठी सातत्याने काम करत आहे. जिल्ह्यात आपण पांदनरस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतला. यावर्षी 533 रस्त्यांची कामे मंजूर झाली आहे. मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात यातील जास्तीत जास्त कामे होणे अपेक्षित आहे. या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वर्धा, सेलू व देवळी तालुक्यातील 121 मातोश्री शेत, पांदनरस्त्यांचे ई-भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.पाते, रोहयोचे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार आदी उपस्थित होते.
आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जितक्या जास्त सुविधा आपण उपलब्ध करून देऊ तितकीच आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. आपण जिल्ह्यात पांदनरस्त्यांची जी कामे हाती घेतली आहे, ती चांगल्या पद्धतीने वेळेत होणे आवश्यक आहे. लवकरच ही सर्व कामे पुर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
पांदनीची कामे करतांना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. त्यांना या रस्त्यांचे महत्व पटवून सांगा आणि त्यांचा सहभाग घेऊन कामे करा. यशवंत पंचायतराज अभियानात वर्धा जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक मिळाला. कारंजा व सेलू पंचायत समितीला विभागातून अनुक्रमे पहिला व तिसरा क्रमांक प्राप्त झाला, ही आनंदाची बाब आहे. पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अजून वाढली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकजूटीने काम करावे. शासन म्हणून काही मदत लागल्यास ती उपलब्ध करून देऊ, असे देखील पालकमंत्र्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी प्रास्ताविक केले. 533 मंजूर कामांपैकी 332 कामे ग्रामपंचायत यंत्रणेद्वारे केली जात आहे. सेलू, वर्धा, देवळी तालुक्यात 103 किमीच्या पांदनरस्त्यांची कामे केली जात असल्याचे ते म्हणाले. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन मोहन सायंकार यांनी केले तर आभार पंचायतचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण देशमुख यांनी मानले.
*पुरस्काराबद्दल पालकमंत्र्यांच्याहस्ते सत्कार*
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत वर्धा जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचा तसेच विभागस्तरावर कारंजा पंचायत समितीला पहिला व सेलू पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल पालकमंत्री डाॅ.पंकज भोयर यांनी दोन