ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वा. सावरकर हे भारतीय संस्कृतीची युगानुकूल मांडणी करणारे महापुरुष _ डॉ. राजेंद्र नाईकवाडे

गोंडवाना विद्यापीठाच्या स्वा. वि. दा. सावरकर साहित्य अध्यासन केंद्र व भारतीय विचार मंचाद्वारे ब्रह्मपुरीत सावरकर जयंती समारोहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

आपल्या भारतीय संस्कृतीचे व ज्ञानपरंपरेचे आधुनिक युगामध्ये पुनरुज्जीवन करणारे व युगानुकूल मांडणी करणारे एक महापुरुष जे आजही आपल्याला प्रेरणा देतात ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. सावरकरांचे काव्य, त्यातील शब्दकळा, प्रतिभाशक्ती, प्रतीके, त्यातील भव्य-दिव्यता हे इतके विलक्षण आहे की तुम्ही त्यांच्या केवळ काही कविता जरी वाचल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची विराटता आपल्या अनुभूतीस येईल. सावरकरांच्या केंद्रस्थानी प्रेम होते व अशा प्रकारचे मन लाभलेले कवी हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी ब्रह्मपुरी येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात सावरकर जयंती समारोहामध्ये केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ व भारतीय विचार मंच, ब्रह्मपुरी यांच्या तर्फे सावरकर जयंती समरोहाचे आयोजन ब्रह्मपुरी येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, ब्रह्मपुरी चे अध्यक्ष प्रा. अतुल देशकर उपस्थित होते. तसेच गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, डॉ. संजय गोरे, प्रशांत दोंतुलवार, अधिसभा सदस्य संजय रामगीरवार, स्वरूप तारगे, भारतीय विचार मंचाचे सतीश शिनखेडे, स्वा. वि. दा. सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे प्रस्तावक यश बांगडे व समन्वयक डॉ. चैतन्य शिनखेडे व समिती सदस्य विद्याधर भाई, धनंजय गहाणे व किरण कापगते हेसुद्धा उपस्थित होते.

डॉ. नाईकवाडे म्हणाले, माझी जन्मठेप ह्या सावरकरांच्या आत्मचरित्राचा भारतीय साहित्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा पट त्यामध्ये आहे. सावरकरांचे बहुतांश काव्य छंदोबद्ध आहे. अंदमानच्या काळकोठडीत मृत्यु समोर दिसत असताना भिंतीवर सावरकरांनी साहित्य लिहिले आणि ते पाठ केले. जगाच्या इतिहासामध्ये कारवासामध्ये साहित्य निर्मिती करण्याची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतील मुकुटमणी शोभेल असे जर कोणाचे साहित्य असेल तर ते सावरकरांचे आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्वात कळवळा आहे. त्यांची कविता सच्ची आहे. मातृभूमी हा सावरकरांच्या कवितेचा मुख्य विषय आहे परंतु हा कवितेचाच मुख्य विषय नसून त्यांच्या जीवनाचाच मुख्य विषय आहे. त्यांच्या कवितेतील आत्मानुभूतीचे बळ तिथून आले आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कावळे म्हणाले की सध्याच्या तरुणांना स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे तेजस्वी व्यक्तिमत्व समजावून सांगण्याची गरज आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अध्यासन केंद्रांमार्फत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहचत आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदास कामडी यांनी केले तर जयंतराव पिंपळापुरे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मत्ते व आभार प्रस्तावक यश बांगडे यांनी मानले.

 

 

 

 

 

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये