तेथे होणारा जास्तीचा पाणीपुरवठा बसतो पैनगंगेच्या प्रवाहाच्या मुळावर
राखीव साठ्यातून सोडावे लागणार पाणी ; उद्योगांनाही फटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठाच्या डोंगररांगातील मढ येथून उगम पावणाऱ्या व बुलढाणा च्या ‘जाईचा देव ‘येथून प्रवाहित होणाऱ्या विदर्भातील सर्वात लांब नदीमध्ये समावेश असलेल्या पैनगंगा नदी चे अनेक ठिकाणी पात्रात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. यात नांदेड, यवतमाळ, आदिलाबा,चंद्रपूर जिल्ह्यातील सरहद्दीचा समावेश आहे. याला मुख्यत्वे नदीच्या ईसापुर धरणातून उजवा कालवात जास्तीचा पाणी पुरवठा कारणीभूत ठरते आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन अभावीचा फटका बारमाही वाहणाऱ्या नदीला सोसावा लागत आहे.
पैनगंगा नदीची लांबी उगम स्थानापासून ६७६ किलोमीटर आहे. बुलढाणा, हिंगोली, वाशिम , नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यासाठी ती जीवनवाहिनी आहे. याच नदीच्या माध्यमातून शेती सिंचन, उद्योग, नळ योजना आदींना पाणीपुरवठा केला जातो. १९६८ साली याच नदीवर हिंगोली – यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील पुसद तालुक्यातील ईसापुर येथे ९६४ द श ल क्ष घनमीटर क्षमता असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून उजवा व डावा कालवा तयार करण्यात आला. १४० किलोमीटरच्या उजव्या कालव्यातून मराठवाडा म्हणजेच नांदेड, हिंगोली जिल्हा तर ८४ किलोमीटर च्या डाव्या कालव्यातून यवतमाळ जिल्ह्याला पाणी पुरवठा करण्यात येतो.यातील डाव्या कालव्याचे काही ठिकाणी काम अर्धवट आहे. याशिवाय मेन कॅनल,ब्रांच कॅनॉल,कालवा, चाऱ्या अशी तब्बल १६०० किलोमीटर लांबीचे कालवे आहे. यातून ७० टक्के पाणी उजव्या कालवातून नांदेड, हिंगोलीलाच सोडले जाते. परिणामत धरण व नदीतील जलसाठा कमी होतो. तसेच पुसद ,उमरखेड तालुक्याच्या पुढील नदी पात्रात ही पाणी शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती धरण निर्मितीपासून झाली आहे. शिवाय ब्रिटिशाच्या कच्च्या नियोजनात असलेला याच नदीवरील खालच्या भागातील दुसऱ्या घाटंजी तालुक्यातील निम्न पैनगंगा प्रकल्प प्रकल्पाचे काम अजून झाले नाही. त्यामुळे पाण्याची साठवण राहत नाही.
यातच आदिलाबाद जिल्ह्यात ही नदीवर चनाखा कोर्टा येथे बॅरेज बंधारा बांधण्यात आला आहे. तेथील पाणी तेलंगणा राज्यात जाते. शिवाय विविध गावच्या नळ योजना, नदी लगतचे शेतीची सिंचन पंप, उद्योग यांना ही नदीतूनच पाणीपुरवठा होतो. नदीवर निम्न पैनगंगा प्रकल्प व यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात उच्च पातळीचे बंधारे निर्मिती झाली असता ते पाणी साठवणीत राहून पूर्णत वर्धा नदीला वाहून गेले नसते. पाण्याचे नियोजन ही योग्य रित्या होऊन बारामाही नदी काही ठिकाणी कोरडी होऊन पाण्याची समस्या उद्भवली नसती. या अनुषंगाने यावर शासनाकडून विशेष उपाय योजना होण्याची गरज आहे.
पाणी सोडून ही नदी कोरडी …
ईसापुर धरणात ५३.४० टक्के पाणीसाठा आजच्या स्थितीत उपलब्ध आहे. मागील वर्षी हाच साठा आजच्या तारखेत ४३.६४ टक्के होता. त्या तुलनेनी बघायचं झाल्यास पाणी साठा ८ टक्के जास्त आहे.
ईसापुर धरणातून ४ द ल घ मी पाणी नदीपात्रात अलीकडे सोडण्यात आले. परंतु ते पोहोचायला वेळ लागणार आहे. तेही अपुरे पाणी लक्षात घेता ८ द ल घ मी पाणी सोडण्याची मागणी यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पाणी नाही सोडल्यास तर शेवटच्या टोकावर पाणी पोहचणे कठीणच आहे.
उद्योगाच्या पाठबळातून बंधाऱ्याची निर्मिती गरजेची
यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात पैनगंगेचं पाणी उन्हाळ्याच्या दिवसात टिकून राहण्यासाठी परसोडा ( पिंपरड ), गांधीनगर ( तेजापूर) , वढा ( जुगाद ) येथे उच्च पातळी बंधाऱ्याची निर्मिती करून कालवे तयार करण्याची आवश्यकता आहे. ज्यातून पाणी साठा ही टिकून राहील. सिंचन व दोन्ही जिल्ह्यातील ग्रामस्थांना बंधारा कम पुलाच्या माध्यमातून जाण्या येण्याची सोय होईल. उद्योगांनाही मुबलक पाणीपुरवठा होईल.
पैनगंगेच्या उपनद्यातही पाण्याची अडवनुक
पुस, अडान, वाघाडी, खूनी, कास,अरुणवती, विदर्भ नदी आदी डाव्या तीरावरून तर कयाधू नदी उजव्या बाजूच्या तीरावरून पैनगंगेला मिळते. यातील पुस नदीवर दोन धरणे आहे.तर अन्य नदीवर ही बऱ्याच ठिकाणी पाणी अडले जाते. परिणामी पैनगंगा नदीत इतर दिवसाच्या तुलनेत उन्हाळ्यात पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. त्याचा परिणाम नदीचे प्रवाहावर प्रकर्षाने जाणवतो.