सामाजिक व शैक्षणिक क्रांतीमुळेच समाजात परिवर्तन – प्रा.डॉ. मदन रामटेके
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीमुळेच बौद्ध समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आलेले आहे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. मदन रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त व्यक्त केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती घोडपेठ द्वारा आयोजित आम्रपाली बुद्ध विहार येथे दिनांक १४ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती घोडपेठचे अध्यक्ष समीर लोणे, प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर भैय्या रामटेके, पोलीस पाटील विजय गेडाम उपस्थित होते.
या समाज परिवर्तनामध्ये महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही फुले दांपत्याच्या अथक परिसरामुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक अधिकारामुळे भारतीय समाजामध्ये फार मोठे परिवर्तन घडवून आले आणि त्यामुळे मानवी समाजात परिवर्तनाची लाट निर्माण झाली.
यापुढे ते असे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीमुळे या भारतीय समाजामध्ये धर्म परिवर्तनाची एक नवी लाट निर्माण झाली आणि या समाजाकडे ओबीसीसह इतर लोक डोळस वृत्तीने बघू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यात रमाईचा त्याग आणि परिश्रम फारच सार्थकी लागले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय गेडाम यांनी केले, सूत्रसंचालन मनीष पाझारे यांनी तर उपस्थितांचे आभार ॲड. निशीकांत माहुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.