ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ कंपनीच्या बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीच्या प्रदूषणाविरोधात आंदोलन

राजेश बेले यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर निषेध

चांदा ब्लास्ट

सनफ्लाग आयरन अँड स्टीलद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेलगाव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आज संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर निषेध व्यक्त केला आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना देण्यात आले. 

राजेश बेले यांनी सांगितले की, खाणीतून निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यामुळे जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण होत आहे. ब्लास्टिंगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. प्रदूषणामुळे दमा, हृदयविकार, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, क्षयरोग, कर्करोग, मेंदूचे आजार अशा अनेक गंभीर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नवजात शिशूंमध्ये मृत्युदर वाढत आहे. दूषित पाण्यामुळे अपंग मुलं जन्माला येत आहेत.

त्यामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या रासायनिक द्रव्यांचा निचरा तात्काळ बंद करावा. वरोरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य तपासणी करावी. नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, वायू आणि ध्वनी प्रदूषण तात्काळ बंद करावे. भूजल आणि हातपंपाच्या पाण्याची तपासणी करावी. प्रदूषणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आश्विन दखणे, हवा नियंत्रण निर्देशक व्ही. एम. मोटघरे, प्रधान वैद्यकीय वैज्ञानिक अधिकारी विश्वजित ठाकूर, प्रादेशिक अधिकारी तानाजी जाधव यांना बेशरम झाड फुलांचा पुष्पगुच्छ देऊन ल प्रतिकात्मक सत्कार व पुतळा दहन करण्यात आले. 

या मागण्या मंजूर न झाल्यास २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक सत्कार व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. भविष्यात मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. 

आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य अविनाश पायघन, लक्ष्मण डावरे, अस्मिता देवतळे, माजी उपसरपंच शंकर वाघ, नागो धानोरकर, अजबराव सातपुते, राजू विरुटकर, संदीप देवतळे, विठ्ठल सातपुते, गजानन पवार, प्रेमीला गौरकर, सुनिता डावरे, बेबी धानोरकर, लता सरपाते, जयश्री देवतळे, इरफान शेख, कादर शेख, हर्षल कामपल्लीवार, सोनल बोपटे यांची उपस्थिती होती. 

“प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही आंदोलन तीव्र करू.”

– राजेश वारलुजी बेले

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये