समृद्धी महामार्गावरील पुलांच्या लोखंडी पट्ट्या झाल्या खिळखिळ्या
ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस नितीन कायंदे यांची मागणी.
सिंदखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्ग रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीचा बेस कॅम्प तढेगाव येथे असून,समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३१९.४ वर दोन पुलांच्या लोखंडी पट्ट्या खिळखिळ्या झाल्यामुळे वाहनाचे टायर फुटून अपघात होत आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस नितीन कायंदे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग २०२२ मध्ये खुला झाला,सिंदखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे बांधकाम रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड पुणे यांनी केले आहे. या कंपनीचा बेस कॅम्प तढेगाव येथे असून या बेस कम्प पासून समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३१९.४ वर बांधकाम केलेल्या दोन पुलांना जोडणाऱ्या लोखंडी पट्ट्या खिळखिळ्या झाल्याची बाब मे २०२४ मध्ये पहिल्यांदा समोर आली. समृद्धी महामार्ग खुला केल्यानंतर अवघ्या १६ महिन्यातच पहिल्यांदा डागडुजीचे काम या रोडवर करण्यात आले परंतु डागडुज केल्यानंतर १० महिन्यातच लोखंडी रॉड वर आले,यामुळे दि.१ एप्रिल रोजी रात्री तब्बल १० वाहनांचे टायर फुटले असल्याने ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने अपघात होता होता टळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी,वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या या लोखंडी पट्ट्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराची उच्च स्तरीय चौकशी होणे अपेक्षित असून कामाच्या गुणवत्तेची तपासणी देखील व्हावी अशी परखड भूमिका त्यांच्यावतीनी या निवेदनामध्ये नमूद केली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर मागील दोन वर्षापासून रोडवर सतत अनेक अपघात होत आहे,अनेक लोकांचा जीव या अपघातात गमवावा लागलेला आहे,याचे प्रमुख कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होय. समृद्धी महामार्गाच्या रोडच्या कामाची आणि पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी होणे फार गरजेचे आहे.
सदर कामात गैरव्यवहारामुळे निकृष्ट दर्जाचे काम चौकशी अंती निष्पन्न झाल्यास दोषी असणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावे अशी मागणी नितीन कायंदे यांच्याकडून करण्यात आली आहे.