ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकारने अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन पूर्ण करावे

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

          विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते.आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

     राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची महाराष्ट्रात झालेली पीछेहाट बघता विधानसभेत सत्तेत येण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची खैरात वाटायला सुरुवात केली. असाच प्रकार शेतकऱ्यांसोबत झाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणूकीपूर्वी महायुतीने दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला शासन व राज्यकर्ते पद्धतशीर बगल देत आहेत. आधीच शेतमालाचे पडलेले बाजार भाव, वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असून महायुती सरकारने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना धीर द्यावा. शेतकरी कर्जमाफीचा शब्द माहिती सरकारने पाळावा.

यासाठी सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची तरतूद करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अन्यथा आंदोलन करू अशा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. निवेदन देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, राजीव शिरसाट,माजी सभापती गजानन पवार, रंगनाथ कोल्हे,गणेश बुरकूल,गणेश सवडे,शहाध्यक्ष विजय खांडेभराड,युवक शहरध्यक्ष अभिनव खांडेभराड,इस्माईल बागवान,सचिन कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये