ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेत्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह: आपल्या स्वार्थाच्या तेलात तळणारे “पुरी”

घुग्घूसमध्ये प्रदूषणविरोधी नेत्‍याचं दुटप्पी रूप उजेडात

चांदा ब्लास्ट

घुग्घूस: शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. वाढत्या औद्योगिक प्रकल्पांचा प्रभाव आणि बेकायदेशीर बांधकामांमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीही संकटात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, प्रदूषणविरोधी आंदोलन करणाऱ्या एका माजी बाजार समिती नेत्याचं खोटं आणि दुटप्पी रूप आता जनतेसमोर आलं आहे.

आंदोलनापासून दलालीपर्यंत: नेत्याच्या भूमिकेतील बदल

हा तोच नेता आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी पर्यावरण नाश करणाऱ्या कंपनीविरोधात मोठा लढा दिला होता. त्याने अवैध उद्योग आणि पर्यावरण नासाडीविरोधात मोर्चे काढले, सभा घेतल्या आणि स्वतःची प्रतिमा एका प्रामाणिक कार्यकर्त्याच्या रूपात निर्माण केली. पण आता, तोच नेता या कंपनीच्या जवळ पोहोचला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या नेत्याने आपल्या दलाल मित्रांसोबत मिळून शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीशी त्याचे संबंध अधिकाधिक वाढले असून, त्यामुळे तो लाखो रुपये मिळवत आहे. एकेकाळी जनतेच्या हक्कांसाठी लढणारा हा नेता आता स्वतःच दलालीच्या खेळात सहभागी झाला आहे, ज्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान, नेत्यांचा फायदा

घुग्घूसमधील अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना आधीच त्यांच्या जमिनींच्या योग्य किंमतीबाबत चिंता होती. आता, या नेत्याने आणि त्याच्या साथीदारांनी कंपनीशी हातमिळवणी केल्यामुळे, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींसाठी योग्य किंमत मिळत नाही. दलालांमार्फत कमी किमतीत शेतजमिनी विकत घेतल्या जात आहेत आणि नंतर त्या अधिक किंमतीला विकल्या जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा नेता पूर्वी आंदोलनाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत होता, पण आता तोच कंपनीच्या समर्थनार्थ उभा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, पूर्वीचा हा संघर्ष केवळ स्वतःचा फायदा मिळवण्यासाठीच केला गेला होता का?

नेत्यांची नैतिकता फक्त दिखावा?

घुग्घूसच्या राजकारणात अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. याआधीही अनेक वेळा पाहायला मिळाले आहे की, नेते जनतेच्या समस्यांवर मोठमोठे भाषणं करतात, पण त्यांना वैयक्तिक फायदा मिळाल्यावर ते त्यांच्या मूळ विचारधारेला सोडून देतात.

म्हणूनच, आता प्रश्न निर्माण होतो की, हे नेते खरोखरच जनतेसाठी लढत होते की, हा सगळा केवळ एक राजकीय खेळ होता? जनतेने आता जागरूक राहण्याची आणि कोणत्या नेत्यांवर विश्वास ठेवायचा याचा नीट विचार करण्याची गरज आहे.

जनतेने सावध राहण्याची गरज

“कारण ही जनता आहे, सगळं जाणते साहेब!”

जनता आता अशा नेत्यांच्या खऱ्या चेहऱ्याला ओळखू लागली आहे. राजकारणात नैतिकता आणि प्रामाणिकपणाची चर्चा करणे सोपे आहे, पण ती पाळणे कठीण. आता वेळ आली आहे की, जनता अशा संधीसाधू नेत्यांना ओळखून त्यांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये