कोरपना येथील त्या नियोजित पेट्रोल पंपाला आदिवासी संघटनेचा विरोध
आदिवासी आश्रम शाळा लागून असल्याने जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कोरपना येथील राष्ट्रीय महामार्गावरील स्व. भाऊराव पाटील चटप आदिवासी आश्रम शाळा व स्व. संगिता चटप उच्च माध्यमिक विद्यालयात आदिवासींची मुले शिक्षण घेत आहे. सदर आश्रमशाळेच्या वस्तीगृहाला लागून असलेल्या जागेवर नियोजित पेट्रोल पंप उभारण्यासाठी जागा अकृषक करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागितल्याची बाब उघडकीस आली. मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी भावना आदिवासी पालकांमध्ये निर्माण झाल्याने आदिवासी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर प्रक्रिया थांबविण्याची मागणी निवेदन द्वारे केली आहे.
आदिवासी आश्रमशाळेच्या अंदाजे १५० मिटर परिसरात सर्व्हे नंबर ३०/४/अ/१ आराजी ०.३५ हे. आर. जमिन वाणिज्य वापराकरिता पेट्रोल पंप उभारण्याच्या दृष्टीने अकृषक करण्याबाबत आलेल्या अर्जावर सदर आक्षेप घेण्यात आला.
या आश्रमशाळेमध्ये वर्ग १ ते १२ वी पर्यंत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कोरपना हा अतिदुर्गम तालुका असल्याने अनेक गावात चौथी ते सातवीपर्यंतच शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. कोरपना येथील आश्रम शाळेत तालुक्यातील २५ ते ३० गावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. जिल्हाधिकारी यांनी सदर कारवाई न केल्यास आदिवासी संघटनेनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कोरपना तालुक्यांतील जवळपास ४० गावातील आदिवासी समाज संघटनांनी सदर पेट्रोल पंप विरोधात एन ओ सी रद्द करण्यासाठी मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे.
या आश्रम शाळेत आदिवासी समाजाचे 600 ते 700 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने भविष्यात पेट्रोल व डिझेल ज्वलनशील पदार्थ असल्याने एखादा अपघात झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास हानी झाल्यास त्याला कोण जबाबदार राहतील? त्यामुळे शासनाने आधीच आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आश्रम शाळेजवळ सोडून इतर ठिकाणी पेट्रोल पंपकरिता परवानगी द्यावी.
– जितेश कुळमेथे, विदर्भ सचिव, टायगर आदिवासी संघटना
आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही तालुक्याबाहेर मुले शिकवु शकत नाही. या ठिकाणी निवासी वस्तीगृह असून वर्ग १ ते १२ वी पर्यंत आमची मुले आश्रम शाळेतील निवासी वस्तीगृहात राहुन शिक्षण घेत आहे. या मुलांच्या भरोशावर आमचे भविष्य आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात राहत असल्याने आम्ही पहिलेच शिक्षणापासून वंचित आहोत. त्या ठिकाणी पेट्रोल पंप झाल्यास आमचे मुलं असुरक्षित राहतील व वाहनांच्या येण्या जाण्याने ध्वनी प्रदूषण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो.
•कृष्णा भाऊ मसराम
जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर