सिमेंट कंपन्यामुळे परिसरात वाढले प्रदूषण
स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ; स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीयांचा भरणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
तालुका हा आदिवासी बहुल व मागास समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील गडचांदुर नगरपंचायत,नांदा, आवालपुर, नारांडा ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाण पत्र देताना शहरातील बेरोजगार आणि पाहिजे त्याला रोजगार, शहराच सौन्दर्यीकरण या बाबीच आश्वासन दिले. मागील काही दिवसात प्रकल्पात रोजगार भरतीसाठी पडताळणी केली असता कंपनीमध्ये शहरातील स्थानिक तरुण बेरोजगारांना हाताला काम लागत नसल्याच्या प्रतिक्रिया आल्या.
मागील अनेक वर्षापासून येथील स्थानिक बेरोजगारांना मोठी आशा लागली होती की सिमेंट कंपनीत प्रत्येक तरुणांच्या हाताला मागेल तेवढा रोजगार मिळेल. परंतु काही मूठभर लोकांना हाताशी घेऊन हजारो तरुणांच्या हातात तुरी देण्याचं काम या कंपनीने केलं आहे. लोकप्रतिनिधी सुध्दा या बाबीकडे लक्ष देत नाही. त्यामुळे फक्त आजार, रोगराई, प्रदूषण देण्यापेक्षा एकदा बंदच असणे स्थानिकांच्या तोंडात बसले आहे.
परप्रांतीयांचा भरणा
गडचांदूर परप्रांतीयांचा एक प्रकारे अड्डाच बनला आहे. गडचांदूर शहरात परप्रांतीयांचे जत्थे उतरताना दिसते. यामुळे गडचांदुर,नांदा फाटा, नारांडा येथील संख्या झपाट्याने वाढत असून शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. शहरात जागा कमी आणि लोकसंख्या वाढत असून याचा नाहक त्रास स्थानीक राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. प्रकल्पामध्ये परप्रांतीयांचे धागेदोरे ठेकेदार सोबत अगदी जवळचे असल्याने स्थानिक तरुणांचा रोजगार कमी होत असल्याचे स्थानीक तरुणांचे म्हणणे आहे.
सिमेंट कंपनीचे अच्छे दिन
दरवर्षी हजारो तरूण मोठ मोठी प्रवेश फी देऊन इंजिनीअर व आयटी आयच्या पदव्या प्राप्त करून नोकरीच्या आशेने बाहेर पडतात. मात्र प्रत्येक ठिकाणी ‘नो व्हॅकन्सी’ चा बोर्ड पाहून निराशा पदरी पडत आहे. कंपन्या नोकऱ्या देत नाही, शासनाचे याकडे लक्ष नाही. तरूणांना स्वाभिमानाने जगता यावे या साठी सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देऊ, अच्छे दिन आने वाले है, असे नाना आश्वासनाची खैरात वाटली गेली. मात्र आता कंपनीचे अच्छे दिन व तरूणांचे बूरे दिन आल्याचे प्रतित होत आहे.
मानवी जीवनावर दुष्परिणाम
गडचांदुर, नांदा फाटा,बिबी, आवाळपुर, नारंडा,बैलंपुर, नोकरी, पालगाव,थुट्रा, हिरापुर यासह अनेक गावांमध्ये मध्ये सिमेंट प्रकल्पा मुळे होणार दुष्परिणामांची प्रमाण वाढले आहे. सिमेंट तयार करण्यासाठी लाइमस्टोन वापरला जाणार. लाइमस्टोन भट्टीमध्ये १४०० डिग्री सेल्सिअस तापमानावर गरम केल्या जातो. लाइमस्टोन मधील कार्बन ऑक्सिजनमध्ये मिसळल्यावर कार्बन डाय ऑक्साईड म्हणून बाहेर येतो. संशोधनानुसार, एक टन सिमेंट तयार करण्यासाठी सुमारे अर्धा टन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. सिमेंट कंपनी कार्यरत असून, दररोज हजारो टन सिमेंट उत्पादन होईल. ज्यामुळे हजारो टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळून कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील तापमान वाढेल व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होत असल्याचे बोलले जात आहे.
मानवाच्या बाबतीत प्रमुख रोग हे श्वसन संस्थेवर आणि फुफ्फूसावर परिणाम करणारे राहतील. त्यामुळे दमा, क्रॅन्सर, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळयातुन पाणी येणे इ. विकार होणार. वनस्पतींच्या बाबतीत त्यांची वाढ खुटंणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे, उत्पन्न कमी होणे इत्यादी परिणाम होतात. हवा प्रदूषणामुळे इमारतीचे नुकसान होणे, रंग बदलणे, वस्तुंची शक्ती कमी होणे, त्यांचे आयुष्य घटणे इत्यादी गोष्टी घडत असून या सिमेंट कंपनीवर कारवाई होईल काय ? असा सवाल जनसामान्यांना कडून विचारला जात आहे.