महाराष्ट्रातील नागरिकांनी केले तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत मतदान
चोक बंदोबस्तात त्या वादग्रस्त १४ गावात मतदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावात तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले.चोक बंदोबस्तात घेण्यात आलेल्या निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार
पडल्या.तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येथील मतदारांना मतदान करण्यासाठी तेलंगणा राज्याचे एकुण चार मतदान केंद्र मतदारांना उपलब्ध करून देण्यात आले होते.यावेळी या गावात फक्त तेलंगणा राज्याचीच विधानसभा निवडणूक असल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती.आणि मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे.
परमडोली ६८%,मुकादमगुडा ६१%,भोलापठार ६६% तर अंतापूर केंद्रावर ८३ टक्के मतदान झाले आहेत.या चारही मतदान केंद्रावर तेलंगणा राज्यातील पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली होती.चोक बंदोबस्तात आणि शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सिमावादातील १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा निर्वाळा झाल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची ठोस अंमलबजावणी केली नाही.
त्यामुळे येथील नागरिक दुहेरी कचाट्यात सापडले आहेत.मागिल अनेक वर्षांपासून या वादग्रस्त १४ गावात दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा राबविली जात असतानाही अजूनही ती वादग्रस्त १४ गावे विकासापासून कोसोदूर असल्याचे बघायला मिळते.वादग्रस्त १४ गावात संपूर्ण मराठी भाषिक नागरिक आहेत. आणि हि महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही गावात तेलंगणा राज्याच्या निवडणूक प्रक्रिया राबविली जाते हि शोकांतिका असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ता रामदास रणवीर यांनी व्यक्त केले.