विदर्भ राज्य आंदोलन समिती कार्यकर्त्यांचे काळ्या फिती लावून चंद्रपूर व राजुरा येथे निदर्शने
विदर्भावरील अन्यायाविरोधात आंदोलन तीव्र करणार - ॲड.वामनराव चटप

चांदा ब्लास्ट
गेल्या ६४ वर्षापासून सर्व संपन्न असलेल्या विदर्भाचे महाराष्ट्राने मोठे शोषण केले असून परिणामी विदर्भात शेतकरी आत्महत्या, प्रदुषण, बेरोजगारी, कुपोषण, लोक प्रतिनिधींची कमी झालेली संख्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, जय विदर्भ जय जय विदर्भ अशा जोरदार घोषणा देत निदर्शन केले.
चंद्रपूर येथील जेटपुरा गेट जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून विदर्भावरील अन्यायाविरोधात १ मे या महाराष्ट्र दिनी निषेध नोंदवित काळा दिवस पाळला. चंद्रपूर येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहिकर, अंकुश वाघमारे, नथमल सोनी, रमेश नळे, शेषराव बोंडे, गोपी मित्रा, कपिल इद्दे, मुन्ना आवळे, रमेश पावडे, राजेश माकोडे, मुन्नाभाऊ खोब्रागडे, देविदास रामटेके, बबन रणदिवे, विलास भाले, मधुकर चिंचोलकर यासह अनेक नेत्यांनी केले.
राजुरा येथील संविधान चौकात समितीच्या वतीने सर्वप्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. सकाळी १० ते ११ या वेळात काळ्या फिती लावून आणि विदर्भ राज्याच्या जोरदार घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व डोमेश्वर बोंडे, शेषराव बोंडे, दिनकर डोहे, बंडूभाऊ माणूसमारे, प्रदीप बोबडे, डाॅ.अमृत गोरे, दिलीप डेरकर, भाऊराव बोबडे, प्रफुल्ल कावळे, सचिन कुडे, रमेेश लांडे, मारोती येरणे, शौकत अली, नरेंद्र मोहारे, रमेश रणदिवे, सुरज गव्हाणे, भाऊराव बोबडे, राहुल बानकर, सुनील गौरकार, उत्पल गोरे, वैभव अडवे, सारंग रामगिरवार, बळीराम खुजे, विक्रम कोदिरपाल, बंडू साळवे यांचेसह अनेक कार्यकर्ते आणि विदर्भवादी नागरिक उपस्थित होते.
आंदोलनाची मालिका सुरू होणार – ॲड.वामनराव चटप
द्विभाषिक राज्यात ४ वर्ष व मराठी राज्य महाराष्ट्रात ६४ वर्ष राहून विदर्भाच्या वाट्याला शेतकरी आत्महत्या, प्रदुषण, कुपोषण, बालमृत्यू, गर्भारमाता मृत्यू, नक्षलवाद, सिंचनाचा अनुशेष, कमी झालेला एक खासदार व चार आमदार यामुळे कमी झालेले प्रतिनिधीत्व आणि नौकरीसाठी सुरु असलेले सुशिक्षीत बेरोजगारांचे स्थलांतर हे सर्व आले आहे. हे सर्व रोखण्याकरीता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे.
नागपूर कराराप्रमाणे व घटनात्मक दुरुस्तीनंतर घटनेला ३७१(२) हे कलम जोडल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमानी विदर्भाला लोकसंख्येच्या आधारावर २३ टक्के निधी देणे बंधनकारक होते. परंतु सिंचन, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, पिण्याचे पाणी, समाजकल्याण या विभागाकरीता ७५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणे क्रमप्राप्त होते व एवढा विदर्भाचा अनुशेष वेगवेगळ्या येणा-या सरकारने वाढविलेला आहे. आजची राज्याची बुडीत निघालेली अवस्था बघता विदर्भाचा आणि येथील जनतेचा परिस्थिती कदापीही सुधारणे शक्य नाही. म्हणून या महाराष्ट्र दिनी समिती निषेध नोंदवित असून आगामी काळात सत्तेत येणा-या केंद्र सरकार ने तातडीने विदर्भाचे स्वतंत्र राज्य द्यावे, अशी आम्ही मागणी करतो. अन्यधशथा यापुढे पुन्हा तीव्र आंदोलनाची मालिका सुरू केली जाईल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी यावेळी बोलतांना दिला.