जल, जंगल, जमिनीसाठी भारतीय जैन संघटनेने योगदान द्यावे – शरद पवार
भारतीय जैन संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शैक्षणिक आणि सामाजिक कामात गेल्या चाळीस वर्षांपासून शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे. देशात ज्या ज्या वेळी समस्या आली त्यावेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.
भविष्यात जल, जंगल, जमिनासाठी जैन संघटना मोठे योगदान देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, उद्योजक प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विजय दर्डा, विठ्ठल मणियार, जितोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, डॉ. चैनराज जैन, सरला मुथ्था कोमल जैन आदी उपस्थित होते़. तसेच देशातील सर्व राज्यांतून आलेल्या बीजेएसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले आहेत.
पवार म्हणाले की, सेवा करण्यासाठी जैन समाज कायम प्रयत्नशील आहे. जैन संघटनेचा सामाजिक सेवेचा ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे़.
समाजातील सगळ्या पंथांनी एकत्र येत मोठे सामाजिक काम उभे केले आहे. देशात जेव्हा समस्या येते, तेव्हा ती सोडवण्यासाठी सकल जैन समाज हा सर्वात आधी पुढे येतो.
लातूर भूकंपाच्या वेळी तिथे राहून मी सगळी पाहणी केली होती. अन्न, घर, मेडिकल, मुलांचे शिक्षण यासह तिथे अनेक समस्या होत्या. या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला शांतीलाल मुथा यांचे नाव आठवले. त्यावेळी त्यांनी तिथे मोठे काम उभे केले होते. त्यानंतर गुजरातमध्ये देखील संघटनेने मोठे काम केले. गुजरातमध्ये गावा गावात फिरून आम्ही समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अन्न,मेडिकल यासह विविध समस्या सोडविल्या. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था केली होती. शिक्षणात देखील संघटनेने चांगले काम केले आहे.
संस्थापक शांतिलाल मुथ्था म्हणाले की, “कोरोनाच्या काळात भारतीय जैन संघटनेने देशात सर्वात जास्त काम केले. संकटाच्या काळात जैन समाज सगळ्यात पुढे उभा असतो. भविष्यातही सामाजिक काम सातत्याने उभा केले जाणार आहे.”
विजय भंडारी म्हणाले की, “देशात येणाऱ्या प्रत्येक संकटात जैन संघटना काम करत असते. समाजाकडून प्रत्येकाला चांगला नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न केले जातात. आर्थिक, शैक्षणिक, धर्म, गोशाळा, संस्कार यासह विविध क्षेत्रात संघटना सगळ्यात वरती आहे.”
देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान : मोहोळ
देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत जैन समाजाचे मोठे योगदान आहे. समाज एकविचाराने राहिला. सर्वांनी एकत्रित सातत्याने काम केले तर फार मोठे काम होते. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जैन समाज आहे. जैन संघटनेमध्ये काम करणारी माणसे ही अत्यंत प्रेमळ आणि सुसंकृत आहेत. भविष्यात प्रत्येक चांगल्या कामात आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मी अजून तरुणच : शरद पवार
सूत्रसंचालकांनी शरद पवार हे ८४ वर्षांचे असून अजूनही तितक्याच जोशाने काम करतात, असे सांगितले. त्यावेळी पवार भाषणाला उभा राहिल्यावर सर्वांकडे बघत म्हणाले, कोणी सांगितले मी ८४ वर्षांचा आहे? असा प्रतिप्रश्न करत मी अजून तरुणच आहे असे त्यांनी सर्वांना मिश्कीलपणे सांगितले. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवुन दाद दिली