ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी व बचत गटाच्या कल्याणासाठी चंद्रपूरची “बाजारहाट” ठरणार वरदान!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून कृषी विकासाला मिळणार गती

चांदा ब्लास्ट

बळीराजाच्या संपन्नतेसाठी सतत प्रयत्नशील राहणार : ना.सुधीर मुनगंटीवार

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी कृषी क्षेत्रात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देणे, शेती उत्पादने विक्री व प्रदर्शनी करिता दालन आवश्यक आहे ; ग्राहकांनाही ताजा भाजीपाला, रानमेवा मिळावा, या माध्यमातून बचत गटांना बळ मिळावे यासाठी चंद्रपूर येथे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारली जाणारी सुसज्ज बाजार हाट शेतकरी कल्याणाचा मार्ग सुकर करणार आहे.

 पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार सातत्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. विधीमंडळात आणि विधिमंडाळाबाहेर शेतकरी हितासाठी जे-जे करता येईल त्यासाठी श्री. मुनगंटीवार लढत आले आहेत.धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचे राज्याच्या कृषी विकासात महत्वाचे योगदान आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला कसे सुखी करता येईल, याचा संकल्प महायुती सरकारने केला आला असून, चंद्रपूर जिल्ह्यात ‘मिशन जयकिसान’ अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून कृषी विभागाच्या १६ एकर जमिनीवर कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट, हायटेक नर्सरी, खाद्य संस्कृती विकसीत करण्यासाठी फूडकोर्ट इत्यादींकरीता ६५ कोटी रुपये मंजूर केले असून, चंद्रपूर जिल्ह्याला कृषी क्षेत्रात अग्रेसर करण्याचा आपला मानस ना. सुधीर मुनगंटीवार यांचा मानस आहे.

जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी उत्पादित केलेली विविध शेती उत्पादने प्रदर्शन व विक्रीकरिता आणि नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेण्याकरिता ८०० आसनाचे हायटेक वातानुकुलीत प्रशिक्षण गृह, बाजार हाटी करिता दुकाने, गोदामे शीतगृह प्रशिक्षणार्थींकरिता वसतिगृह, प्रदर्शन गृह, भोजन व उपहारगृह,फळे पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर, मृदा परीक्षण प्रयोगशाळा आत्मा व शासकीय नर्सरीचे कार्यालय असा हा सुसज्ज अत्याधुनिक परिसर चंद्रपूर शहरात शेतकऱ्यांकरिता तयार होणार आहे. या हायटेक नर्सरीमध्ये विविध फळ पिके, भाजीपाला व फुल, पिकांची उच्च प्रतीच्या कलमावर रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘जय जवान, जय किसान’ चा नारा देणा-या शेतकरी बांधवांना सुखी करण्याचा संकल्प आम्ही केला असून रानभाजी, वनऔषधी यासाठी जिल्ह्यात नैसर्गिक वातावरण असून याचे उत्पादन वाढावे व बाजारापेठ मिळावी यासाठी मी आग्रही आहे असेही ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

रानभाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी, शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता, कृषी उत्पादनाच्या मार्केटिंग संदर्भातील माहिती देण्यासाठी या अत्याधुनिक बाजारहाटेत विशेष दालन राहणार असून प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न राहणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील वनऔषधी आणि रानभाजी आपण निर्यातही करू शकलो पाहिजे ज्यामुळे शेतकरी आणि शेती हे दोन्ही घटक उर्जितावस्थेत येतील असा विश्वास पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना आहे.चंद्रपुर येथील कृषी विभागाच्या जागेवर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान केंद्र तसेच नाविण्यपूर्ण कल्पनेतून फूडकोर्ट तयार करण्यासाठी ६४ कोटी ९९ लक्ष रुपयांच्या प्रस्तावाला पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रहामुळे मान्यता मिळाली.

फूडकोर्टमुळे खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन!

 या बाजारहाट परिसरात होणाऱ्या फूडकोर्टच्या माध्यमातून आपली खाद्य संस्कृती विकसीत होईल असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. विविध प्रकारच्या रानभाज्या कधी खाव्यात, कशा खाव्यात आणि त्याचा उपयोग, या बाबी आपल्याला सुरवातीला ‘आजीच्या बटव्यातून’ कळत होत्या; आता मात्र 10 मिनिटात मोबाईलवरून माहिती मिळते, याच धर्तीवर अत्याधुनिक सोयी सुविधा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या बाजारहाटेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प ना. मुनगंटीवार यांनी केला आहे.

जिल्ह्यातील भाजीपालाही निर्यात होऊ शकतो : जगात दुस-या क्रमांकाचा भाजीपाला भारतात पिकतो. पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे. भाजीपाल्याचे उत्पादन वाढविण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहत आहे. त्यातून दर्जेदार उत्पादन येईल आणि हळूहळू भाजीपाला निर्यात होऊ शकतो, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

लोकांपर्यंत रानभाजीचे महत्व पोहचावे :

सध्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आहारातून अनेक प्रकारची रसायने पोटात जातात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. यावर मात करण्यासाठी व सकस आहारासाठी रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचावे, पौष्टिक तृणधान्यातून शरीराला चांगला आहार मिळू शकतो. शेतक-यांनी अधिक जागृत होऊन पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन करावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.

रान भाज्यांना प्रतिष्ठा मिळणार

धानभाजी, केला भाजी, कुंजीर भाजी, गोपीन भाजी, कुकुरडा, खापरखुरी भाजी, तरोटा, कुड्याचे फूल, काटवल, फेटरे, भुईनिंब काढा, इगडोडी, धोपा, करवंद, विविध प्रकारचे लोणचे, बांबु वायदे इत्यादींना या बाजारहाटेच्या निमित्ताने प्रतिष्ठा मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये