ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरणार – विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

ब्रम्हपूरीत भरपावसात काॅंग्रेसच्या वतीने विराट मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी:- राज्यातील सरकारकडे शक्तीपीठ मार्ग बांधण्यासाठी दीड लाख कोटी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत, उद्योगपतींचे १९ लाख कोटी रुपये कर्ज या महायुती सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची वेळ आली तर त्यासाठी आधी समीती नेमण्याची भाषा हे सरकार करीत आहे. सत्तेसाठी कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी यांच्या हितासाठी झोपलेल्या युती सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करतांना ते बोलत होते. या मोर्चात ब्रम्हपूरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी व काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. सदर मोर्चाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून सुरुवात होवून तहसील कार्यालय ब्रम्हपूरी येथे समाप्ती झाली. मोर्चा दरम्यान पावसाने हजेरी लावली होती. तरी देखील भरपावसात भिजून मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते हे मात्र विशेष. सदर मोर्चा मध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. संपुर्ण शेतकऱ्यांची बोनसची रक्कम ८ दिवसाच्या आत जमा करण्यात यावी.

संजयगांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या ६ महिण्यांपासून थकित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे. सामुहिक वन हक्क समिती मध्ये होत असलेल्या गैर प्रकारची चौकशी करुन राधा ऑर्गनायजेशनवर कारवाई करण्यात यावी. अनुसुचीत जाती / जमाती च्या विकासा करीता तरतूद करण्यात आलेला निधी इतरत्र वळवू नये व तो अनुसूचित जाती जमातीच्या उन्नती साठी खर्ची करण्यात यावा व बंद करण्यात आलेला पोर्टल त्वरित सुरु करण्यात यावा. सौर उर्जेच्या ऐवजी पारंपारिक विज जोडण्यात यावी व शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा या मागण्या करण्यात आल्या.

सदर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी नगरसेवक डॉ.नितीन उराडे, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, कृउबा संचालक किशोर राऊत, मुन्ना रामटेके, रवी पारधी, तालुका काँग्रेस सचिव सतीश डांगे, रुपेश बानबले, विजय तुमाने, निनाद गडे, किसान काॅंग्रेसचे वामन मिसार, अतुल राऊत, पुष्पाकर बांगरे, लक्ष्मण जिभकाटे, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका लता ठाकुर, माजी जि.प.सदस्य भावना ईरपाते, माजी पं.स.सदस्य देवेंद्रा मडावी, महीला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुधा राऊत यांसह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, निराधार योजनेचे लाभार्थी, काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये