वैभव कान्व्हेंट स्कूलचे शैक्षणिक विकासात्मक कार्य कौतुकास्पद – बोढेकर
मानवी जीवनमूल्ये विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने बल्लारपूर येथील वैभव कान्व्हेंट स्कूल येथे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हेमंत मानकर होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणून उपस्थित होते तर डॉ. प्रा. श्रावण बानासुरे, माजी मुख्याध्यापक विनायक साळवे, वैभव कान्व्हेंट ब्रांच ए चे मुख्याध्यापक विजय शिंदे, ब्रांच बी चे मुख्याध्यापिका शबिस्ता सैय्यद, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी केले. प्रा. डॉ. श्रावण बानासुरे यांनी श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या विषयानुरूप विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर विनायक साळवे यांनी आजच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता यावर आपले मनोगत व्यक्त केले.
वैभव कान्व्हेंट स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी मांडले. शालेय स्तरावर उत्तम ज्ञानार्जन केल्याने व्यक्ती विनयशील, निर्भय बनतो. सुंदरपणे जीवन जगता यावे, यासाठीच शिक्षण घेणे आहे, असेही ते म्हणाले.
निबंध स्पर्धेत बक्षीस मिळालेल्या वरून धिमण आणि कु. अंकिता कैथल यांना स्मृती चिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले तर गुणानुक्रमे आलेल्या दहा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व राष्ट्रसंत साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हेमंत मानकर यांचा बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तर डॉ . बानासुरे यांनी शाळेसाठी राष्ट्रसंताचे तैलचित्र भेट दिल्याबद्दल वैभव कान्व्हेंट तर्फे त्यांना धन्यवाद देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापिका अशिर्या शेख, शिल्पा देशभ्रतार, जया ठाकरे तसेच इतर शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.