जि.प.शाळेला लोकवर्गणीचा आधार
39 वर्षानंतरही जि.प.प्राथ.शाळा क्र 2 उपेक्षितच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जिल्हा परिषद शाळेला ज्ञानाचे मंदिर असे म्हटले जाते मात्र शासनाचे या जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने सावली येथील जि.प.शाळा क्र. 2 ला सावलीतील दानशुर व्यक्तीच्या पुढाकाराने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी तब्बल 39 वर्षानंतर प्रवेशद्वाराची निर्मीती केली. त्यामुळे शासनाने दुर्लक्षीत केलेल्या जि.प.शाळेला लोकवर्गणीचा आधार म्हणणे वावगे ठरणार नाही. परंतु आजही ही शाळा भौतिक सोयी सुविधापासुन वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे.
सावली शहरातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता सन 1986 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 ची स्थापना करण्यात आली. याच शाळेत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करुन आपले करीअर घडविलेले आहे. परंतु सन 1986 पासुनच ही शाळा शासनाकडुन दुर्लक्षीत केल्या जात आहे. शाळेच्या निर्मीतीपासुनच या शाळेला प्रवेशद्वार नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली होती. या शाळेच्या आवारात अनेक रानटी डुकरे, गुरे, मोकाट कुत्र्यांचा वावर दिसुन येत होता. तर चिमुकल्या विद्यार्थ्यांना यापासुन जिवीतास धोका निर्माण झालेला होता. त्यामुळे पालकांसमोर पाल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. अनेकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, मुलांमुलीसाठी स्वतंत्र शौचालय व मुत्रीघर, रंगरंगोटी आणि इतर भौतिक सुविधांसाठी लोकप्रतिनिधी तसेच शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला परंतु याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसुन येते.
शाळेला भौतिक सुविधा तसेच प्रवेशद्वाराकरीता विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा केली व या चर्चेमधील विषयानुसार लोकवर्गणीमधुन प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात यावी. याकरीता शाळा व्यवस्थापन समितीने शहरातील अनेक देणगीदात्यांची भेट घेवून शाळेतील समस्या सांगितल्या. त्यावर शहरातील देणगीदात्यांनी उत्तम प्रतिसाद दिला व लोकवर्गणीमधुन या शाळेला प्रवेशद्वार बनविण्यात आले. यामुळे येथील विद्यार्थ्यांना सुरक्षितता लाभाणार असुन विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु आजही या शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण यंत्र नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मुलांमुलीकरीता स्वतंत्र शौचालय व मुत्रीघर नसल्याने उघडयावरच शौचास जावे लागत असल्याने पालकांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रोष पहावयास मिळत आहे.
शाळेला भौतिक सुविधा मिळाव्या या करीता शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु सावली येथील जि.प.शाळा क्र. 2 ला शासनाकडुन कोणतेही अर्थसहाय्य न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दानशुर व्यक्ती व पालकांकडुन लोकवर्गणी गोळा कय्न तब्बल 39 वर्षानंतर प्रवेशद्वाराची निर्मीती करण्यात आली. परंतु आजही या शाळेत भौतिक सुविधाची उणिव आहे. शासनाने याकडे लक्ष घालुन या शाळेतील भौतिक सुविधांसाठी निधी मंजुर करावा.
आशिष दुधे, अध्यक्ष शा.व्य.स. सावली