काँग्रेसने काळ्या फिती लावून नोंदविला निषेध
राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी; अत्याचाऱ्यांना फाशी देण्याची मागणी
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : देशातील, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, सरकार केवळ पैशाची उधळपट्टी करून जाहिरातीतून आपली पाठ थोपटून घेण्यात मशगूल आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने चंद्रपुरात शनिवारी (ता. २४) सकाळी शहरातील गांधी चौकात काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अत्याचाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहराध्यक्ष प्रमोद पाटील, युवक काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, युवक काँग्रेसचे (शहर) जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, महिला काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या (शहर) जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. गृहमंत्रालयाकडून गुन्हेगारांविरोधात कारवाईस विलंब केला जात आहे. त्यामुळे राज्यात मागील काही महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा, बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्र, राज्य शासनाच्या कारभारावर टिका केली.