जि.प.शाळेला ठाणेदाराची भेट
भेटी दरम्यान केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
सावली येथील जि.प.प्राथमिक शाळा क्र. २ येथे सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरु यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांना बाथरुम किंवा शाळेच्या बाहेर जातांना चार पाच विद्यार्थी एकत्रपणे जाण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दुधे, मुख्याध्यापक अंजु वाकडे, सहाय्यक शिक्षक चलाख हे उपस्थित होते.
बदलापूर येथील घटनेची पुनरावृत्ती होवू नये या उद्देशाने शासन स्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन सावलीचे ठाणेदार राजगुरु यांनी सावली जिल्हा परिषद शाळा क्र. २ ला भेट दिली. भेटीदरम्यान शाळेची पाहणी केली. शाळेचा परिसर समस्याग्रस्त असुन संरक्षण भिंत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या शाळेला भौतिक सुविधासह संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे. याकडे जिल्हा परिषदेने लक्ष पुरवावे जेणेकरुन बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळता येईल. संरक्षण भिंतच नसल्याने शाळेच्या आवारात मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, रानटी डुकराचा शिरकाव होवू शकतो.
त्यामुळे विद्यार्थ्यांना यापासुन धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मानसिक विकृतीचे रुग्ण शाळेच्या परिसरात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीची नित्तांत गरज असल्याचे त्यांनी व्यक्तव्य केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुरक्षेसंबधी अनेक समस्या असल्याचे ठाणेदार यांना सांगितले. त्यांनी असे काही आढळून आल्यास आम्हाला त्वरीत कळवा आम्ही बंदोबस्त करु अशी ग्वाही दिली.