बामणी प्रोटीन्सचा तिढा सुटला प्लायवूड फॅक्टरीच काय ?
मागील दीड दशकांपासून बंद असल्याने त्या कुटुंबाची झाली वाताहत
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
पालकमंत्र्यांनी यावरही यशस्वी तोडगा काढावा ; अशी कामगारांची मागणी
बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणावर ठपका ठेवल्याने २० मे २०२४ ला बामणी प्रोटीन्स उद्योग कंपनीने अचानक उद्योग बंद केला त्यामुळे एक हजार कामगार कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कंपनीच्या निर्णया विरोधात बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनचे मार्च महिन्यापासून आजतागायात ठिय्या आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेत मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कामगार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन व कंपनीशी यशस्वी चर्चा करून तोडगा काढला यामुळे कंपनी लवकरच सुरू होण्याचे आसार निर्माण झाले आहे. परंतु मागील दीड दशकांपासून विसापूरच्या हद्दीत भिवकुंड येथे असलेली बल्लारशाह प्लायवुड फॅक्टरी ही बंद आहे. यामुळे जवळपास एक हजार कुटुंबाची तेव्हापासून आज पर्यंत वाताहत सुरू आहे. यावरही पालकमंत्र्यांनी यशस्वी तोडगा काढावा अशी मागणी कामगारांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
बल्लारपूर तालुका हा उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मागील २००८ पासून तालुक्यातील प्लायवूड फॅक्टरी बंद पडली आहे. तेव्हापासून आजपर्यंत हजारो कुटुंबाची यामुळे वाताहत झाली आहे. यावर कामगारांनी वेळोवेळी निवेदने दिले, आंदोलन केली. परंतु त्यांच्या आंदोलनावर कोणत्याच पक्षाने किंवा राजकीय पुढार्यांनी लक्ष दिले. नाही परिणामी उद्योग सुरू होण्याची कोणती चिन्हे दिसत नसल्याने कंपनीने फॅक्टरीतले साहित्य भंगारात काढणे सुरू केले. तालुक्यातील एवढा मोठा उद्योग बंद पडल्याने विसापूर परिसरातील आर्थिक नाळ आटली. त्यामुळे अनेक कामगारांना परराज्यात व परजिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर केले तर काहींनी मिळेल ते काम करून गुजराना करत आहे. यामुळे मुंबईमध्ये बंद पडलेल्या मिल कामगारापेक्षाही निपटार जीवन त्यांना जगावे लागत आहे. पालकमंत्र्यांनी बामणी प्रोटीन कंपनी सारखी यशस्वी तोडगा बल्लारशाह प्लायवुड फॅक्टरीसाठी काढून उद्योग सुरू करावा अशी मागणी बल्लारशा प्लायवूड फॅक्टरीच्या कामगारांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
गाव झाला भंकस
पूर्वी चुनाभट्टी व बल्लारशाह प्लायवूड कंपनी, औष्णिक विद्युत केंद्र (पावर हाऊस) सुरू असल्याने विसापूर व आजूबाजूतील परिसरातील बाजाराला चालना मिळत होती. यामुळे कापड, किराणा व इतर मूलभूत गरजा असलेले वस्तू कामगार गावातून खरेदी करत होते. परंतु उद्योग बंद झाल्याने इतर सर्व व्यवसायाला उतरती कळा लागली अनेक कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे अख्खे कुटुंबाच्या कुटुंब रोजगारांसाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे गाव शेजारी सुविधा युक्त क्रीडा संकुल, सैनिक शाळा, जगप्रसिद्ध बॉटनिकल गार्डन, नामांकित एस एन डी टी महिला विद्यापीठ असूनही गाव भंकस झाला आहे.
प्लायवूड फॅक्टरी बंद पडल्या पासून मिळेल ते काम करून संसाराचा गाडा कसा तरी हाकलावा लागत आहे. अनेक कामगारांनी नैराश्यातून व आर्थिक तंगीतून आत्महत्या करून आपले जीवन संपवलेले आहे.
नागोराव ढवस, माजी कामगार बल्लारशाह प्लायवूड कंपनी