तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई द्या
सरपंच संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक भागातील शेतमालासह अन्य प्रकारचे नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करून व पंचनामे करून प्रभावित नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भद्रावती तालुका ग्राम संवाद सरपंच संघटनेतर्फे येथील तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी,विविध गावातील व गावांना जोडणारे रस्ते पुरामुळे खराब झाले आहे,त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अनेक फुलांचे कठडे पुरामुळे वाहून गेले या कठड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे अनेक गावातील पाणीपुरवठा योजनेचे नुकसान झाले त्याची पाहणी करून त्याची आवश्यक ती दुरुस्ती करावी, अनेक गावातील घरांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
मागील वर्षी काढण्यात आलेल्या पीक विम्याची रक्कम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी. अशा मागण्या सदर निवेदनातून शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. निवेदन सादर करताना भद्रावती तालुका ग्राम संवाद सरपंच संघटनेचे नयन जांभुळे, महेश मोरे, राजू डोंगे, मंगेश भोयर, अनिल खडके,रवींद्र देठे आदी उपस्थित होते.