विसरु न शकणाऱ्या सोन्याच्या पत्र्यासारखे आचार्य अत्रे – डॉ धनराज खानोरकर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
“उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे हुनहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य प्र.के.अत्रे होते.ते प्रसिद्ध लेखक,वक्ते, नाटककार,कवी,विनोदकार, शिक्षणतज्ज्ञ,राजकारणी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती.आजही ‘तो मी नव्हेच !’ किंवा ‘मोरुची मावशी’ सारखे त्यांचे नाटक रसिकांच्या कायम स्मरणात राहिले आहे.या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या धन्याला आपण त्रिवार वंदन करुन त्यांच्या स्मृतींना नेहमी उजाळा देण्याचे काम मराठी माणसाने तरी करायला हवे,कारण ते विसरु न शकणा-या सोन्याच्या पत्र्यासारखे आचार्य अत्रे होते.” असे काव्यमय विवेचन ने.हि.महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकरांनी केले.
ते येथील मराठी विभागातर्फे अत्रे स्मृतिदिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन बोलत होते.विचारपीठावर इतिहास विभागप्रमुख डॉ मोहन कापगते, डॉ पद्माकर वानखडे उपस्थित होते.डाॅ.कापगतेंनी, आचार्य अत्रेंनी महाराष्ट्र रिझविला,राज्याला नवा सांस्कृतिक आयाम दिला.साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकली,असे विचार मांडले.
कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणे,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.संचालन , आभार डॉ पद्माकर वानखडेंनी केले.यशस्वीतेसाठी प्रकाश,विजय यांनी सहकार्य केले.