अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण व हेराफेरी
भरतीसाठी अर्ज केलेल्या शेकडो महिला उमेदवारांनी केला आरोप

चांदा ब्लास्ट
जिल्ह्यातील १४ तालुक्यांत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत ५३३ अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण व हेराफेरी झाल्याचा आरोप या भरतीसाठी अर्ज केलेल्या शेकडो महिला उमेदवारांनी केला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून सनदशीर पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करत याविरोधात प्रत्येक तालुका पातळीवर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.
येथील पत्रकार परिषदेत महिला उमेदवारांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ५३३ अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. १ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया ३१ ऑगस्ट अखेर पूर्ण करून निवड झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी १ सप्टेंबरपासून आपापल्या अंगणवाड्यांमध्ये काम सुरू करायचे होते. सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संशयास्पद असल्याचा आरोप महिला उमेदवारांनी केला आहे. या पदांसाठी स्थानिक उमेदवार घेणे बंधनकारक होते, मात्र अनेक स्थानिक उमेदवारांकडे दुर्लक्ष करून बाहेरच्या महिला उमेदवारांची निवड करण्यात आली. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर केली असून, त्या आधारे त्यांची निवड करण्यात आली आहे. मदतनीस पदांसाठी विवाहित महिला उमेदवारांची आवश्यकता असतानाही अनेक ठिकाणी अननुभवी अविवाहित महिला उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.