जिल्ह्यात आता सात राष्ट्रीय महामार्ग
रस्त्याचा लूक बदलला ; वाहतूकही सुलभ
![](https://chandablast.com/wp-content/uploads/2024/05/images.png)
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
मुंबईनंतर राज्याला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख. औद्योगिक, वन, कृषी संपन्न हा जिल्हा. परंतु या जिल्ह्यात वा जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता. अलीकडच्या काळात मात्र या जिल्ह्यातून एक दोन नव्हे तर तब्बल सात राष्ट्रीय महामार्ग उदयास आले आहे.
यातील काही मार्गाचे पूर्णता काम झाले असून तर काही प्रगतीपथावर आहे. यामध्ये ३४७ अ, ९३० ,९३० ड, ५४३ , ३५३ ड, ३५३ ब, ३५३ इ क्रमांकाच्या महामार्गाचा समावेश आहे. सदर मार्ग जुन्या काही प्रमुख राज्य महामार्ग व राज्य महामार्ग मधून परावर्तित करण्यात आले आहे. यातील राष्ट्रीय महामार्ग ३४७ अ हा मुलताई जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ पासून सुरु होऊन वरुड — आर्वी -पुलगाव- वर्धा- सेवाग्राम- हिंगणघाट- जाम पासून वरोरा येथे संपतो. तो संपूर्ण २३१ किलोमीटरचा आहे. दुसरा राष्ट्रीय महामार्ग ९३० हा मुरूमगाव धानोरा -गडचिरोली- सावली – मुल – चंद्रपूर – भद्रावती- वरोरा -वणी- करंजी असा आहे. त्याची लांबी २८० किलोमीटर आहे. तिसरा राष्ट्रीय महामार्ग ९३० ड चंद्रपूर – बल्लारपूर -राजुरा -लक्कडकोट तेलंगणा राज्य सीमा हा ६३ किलोमीटरचा आहे. चौथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ मध्यप्रदेश राज्य सीमेपासून राजेगाव- धामणगाव- रावणवाडी – गोंदिया -आमगाव- देवरी- कुरखेडा वडसा- ब्रह्मपुरी हा असून तो २०४ किलोमीटरचा आहे.
पाचवा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ड नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ पासून सुरु होऊन उमरेड -नागभिड – ब्रह्मपुरी वरून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे संपतो. तो १३७ किलोमीटर अंतराचा आहे. सहावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ ब तेलंगाना राज्य सीमेपासून कोरपना – राजुरा – बामणी – गोडपिपरी – आष्टी असा आहे. त्याची लांबी १०८ किलोमीटर आहे. आणि सातवा राष्ट्रीय महामार्ग ३५३ इ उमरेड पासून सुरु होऊन भीसी – चिमूर – वरोरा पर्यंत आहे. तो संपूर्ण ९० किलोमीटरचा मार्ग आहे.
राष्ट्रीय महामार्गा संदर्भात इतिहास पाहता बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग ची जिल्ह्यातून निर्मिती व्हावी. यासाठी सर्वप्रथम नांदेड – आदिलाबाद – कोरपना – राजुरा – जुनोना – चिचपल्ली – मुल – गडचिरोली – राजनांदगाव – ओरिसा राज्यातील तितलागड पर्यंत चा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु तो वन कायद्यात अडकल्याने तसाच प्रलंबित राहिला. मात्र अलीकडच्या काळात झालेली महामार्ग निर्मिती हा जिल्ह्याच्या रस्ते विकासात विकासाचा माईल स्टोन ठरली आहे. याचा फायदा औद्योगिक , कृषी व परराज्यातून – जिल्हा अंतर्गत आम् रहदारी साठी मोठा झाला आहे. याच सोबत राज्य शासन तफे निर्मित वर्ध्यातील सेलडोह एक्सचेंज पासून पोंभूर्णाच्या घाटकुळ पर्यंत तयार होणाऱ्या समृध्दी महामार्ग चीही जोडही मिळणार आहे.
याही महामार्गाचे चौपदरीकरण आवश्यक
जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यावरची वाढलेली वाहतूक व ताण लक्षात घेता तेलंगणा राज्य सीमा – येल्लापूर -कोरपना – वणी , राजुरा – चुनाला – धानोरा – तेलंगणा राज्यातील शिरपूर , नागभीड – सिंदेवाही – खेडी- गोंडपिपरी, चिमूर – सिंदेवाही – सावली , चिमूर – कानपा, तलोधी – आरमोरी, भिसी – भिवापूर , चिमूर – कोरा –
नंदोरी ( वर्धा )
तेलंगणा सीमा – भारी – जिवती – येल्लापूर – तेलंगणा सीमा – आदिलाबाद , धानोरा फाटा – गडचांदुर – पाटण – जिवती , कोठारी – तोहोगाव – लाठी, येनबोडी – पोंभूर्णा – मुल,
हेही मार्ग यातील काही प्रमुख राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग परावर्तित करून त्यांचा चौपदरीकरण करून विकास साधण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या महामार्गातून झाली राष्ट्रीय महामार्ग ची निर्मिती
जिल्ह्यातील प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक सहा, सात, नऊ, दहा व राज्य महामार्ग क्रमांक २६४ आदी मार्गातील काही किलोमीटर लांबी जोडून राष्ट्रीय महामार्ग मध्ये सदर मार्ग परांवर्तीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ची लाबी आता चारशे किलोमीटरच्या वर आहे.
महामार्गाची करावी योग्य रचना
काही मार्ग प्रमुख राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग मध्ये परावर्तित झाले आहे. यातच काही ठिकाणी अर्धवट लांबी पडली आहे. त्यामुळे सरळ रेषेतील मार्गाचां नियोजनात क्रमांक वेगळा असल्याने रस्त्याचा विकास एकाच वेळी होत नाही. एकीकडे बनला की दुसरी कडे दुर्दशा होते. त्यासाठी अडचण ठरत असलेल्या महामार्गाची योग्य पून रचना होणे अपेक्षित आहे. यात प्रामुख्याने कोरपना – वणी, यवतमाळ जिल्ह्यातील चारगावं चौकी – घुगुस – पडोली, धानोरा फाटा – गडचांदुर – पाटण, जाम – वरोरा – चंद्रपूर, वणी – वरोरा – उमरेड, चंद्रपूर ते गोंडपिपरी – आष्टी, बामणी – राजुरा – आसिफाबाद या सरळ रेषेतील मार्गाला अधे मध्ये न वर्ग करता एकच महामार्ग क्रमांक देणे गरजेचे आहे.