जिवती तालुक्यातील जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले!
कुठे अर्धवट कामे तर कुठे कामाचा पत्ता नाही ; थातूरमातूर कामाला पाठबळ कुणाचे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती : प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पोहोचविण्याचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जलजीवन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबवित दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावात पाणी टंचाई येण्यापुर्वी या योजनेतून पाणी मिळणार असल्याचा दावा करणाऱ्या शासनाचा दावा
जिवती तालुक्यात फोल झाल्याचे चित्र दिसत आहे.कुठे अर्धवट कामे करून कंत्राटदार गायब आहेत तर काही गावात अजूनही कामाचा श्रीगणेशा झाला नसल्याचे दिसून येत असून संबंधित अधिकारी याबाबत गंभिर दिसत नाहीत.काही गावात झालेली कामेही निकृष्ट दर्जाची झाल्याची जनतेची ओरड सुरू आहे.मात्र अधिकारी व कंत्राटदार मिळून मिसळून असल्याने जनतेच्या तक्रारीला कुणीच दाद देत नाहीत.परिणामी या योजनेचा फायदा जनतेला कमी अन् कंत्राटदार व अधिकाऱ्यांनाच यांचा फायदा होत असून कमिशनच्या नादात महत्वाकांक्षी योजनेची वाट लागली आहे.झालेल्या कामाची संबंधित विभागाने चौकशी केल्यास अधिकारी व कंत्राटदार हातमिळवणी करून शासन योजनेची कशी पध्दतशीरपणे विल्हेवाट लावतात याचे पितळ उघडे पडणार आहे.
जिवती तालुक्यात जलजीवन मिशन योजनेतंर्गत १४७ कामांना मंजुरी मिळाली त्यापैकी आजघडीला १४३ कामे पुर्ण झाल्याचे संबंधित अभियंता एस.बगळे यांच्याकडून सांगितले जात आहेत मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.बऱ्याच गावांतील कामे अर्धवट करून कंत्राटदारवर गायब आहेत तर काही गावात अजूनही कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यांपूर्वी हि संपूर्ण कामे पुर्ण करण्याचे शासनाने अल्टिमेटम दिले होते मात्र अद्याप ही कामे पुर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे.
परिणामी मच्छिगुडा,गोंडगुडा(भारी),चलपतगुडा,कमलापूर,शंकरपठार,घोडणकप्पी,चोपनगुडा(भारी),सिंगराईगोंदी, लखमापूर,लेंडीगुडा,भुरीयेसापूर,करनगुडा सारख्या विविध गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.यातील काही गावांना नाल्यात चर खोदून दुषीत व गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचा प्रकार बघायला मिळत असतानाही संबंधित कंत्राटदार व या कामावर शासनाने नियुक्त केलेला अभियंता मात्र निवांत आहेत.शासनाने सुरू केलेल्या या महत्वकांक्षी योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी व पाणी टंचाई परिस्थिती येण्यापुर्वी कामे कंत्राटदारांकडून घेण्याची जबाबदारी त्या अभियंत्यांची आहे परंतु असे झाले नाही,शासनाचे जबाबदार अभियंतेच कंत्राटदाराला हाताशी धरून भागीदारी करित मोठ्या प्रमाणात या जलजीवन मिशन योजनेत गैरव्यवहार करून मालामाल होत असल्याची चर्चा असून यामुळे जलजीवन मिशन योजनेतंर्गत होत असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर शंका येत आहे.
जिवती तालुक्यात झालेल्या जलजीवन योजनांच्या कामाची योग्य चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांना शासन काळ्या यादीत टाकणार काय, देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार पकडून त्यांच्यावर शासन कार्यवाही करणार की त्याला पाठबळ देऊन मोकळे सोडणार की काय ? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.याबाबत प्रतिनिधीने अभियंता एस.बगळे यांना मोबाईलवर संपर्क केला असता कामाची माहिती देण्यास टाळाटाळ करित उडवाउडवीची उत्तरे दिली.