देवलागुड्यातील जलजीवन योजना फसली
‘जलजीवन’ चे अधिकारी,कंत्राटदार मालामाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देवलागुडा येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली.मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या खाऊगिरीमुळे महत्वाकांक्षी योजनेचे पितळ उघडे पडले आहे.लाखो रूपये खर्च करून योजना वर्षभरातच बंद पडल्याने परिणामी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.सध्या ग्रामपंचायतीने बोअरवेल अधिग्रहण करून गावात पाणी पुरवठा करीत असली तरी शासनाने लाखो रुपये खर्च करून अल्पावधीत बंद पडलेल्या जलजीवन योजनांचे काय.यात नक्कीच कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी हातमिळवणी केली असावी म्हणूनच याकडे विशेष लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावात पाणी टंचाई कायमची सुटावी यासाठी जलजीवन योजनेतून लाखो रुपये खर्च करून जुन्याच विहिरीचे खोलीकरण करण्यात आले.विहिरीच्या खालच्या बाजूस बोअरवेल खोदली परंतु कंत्राटदारांनी केसिंग पाईप कमी टाकल्याने भरपूर पाणी लागूनही बोअरवेल खोदतानाच खचली गेली परत विहिरीच्या वरच्या बाजूला पुन्हा बोअरवेल खोदली मात्र तिथेही पाणी लागले परंतु त्या बोअरवेलमध्येही फक्त विसच फुट केसिंग पाईप टाकल्याने वर्षभरातच बोअरवेल खचली,मोटारही बुजली गेली त्यामुळे पाणी असूनही पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.
सध्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बोअरवेल अधिग्रहण करून गावात पाणी पुरवठा करीत आहे परंतु लाखो रुपये खर्च करून बंद पडलेल्या जलजीवन योजनेचं काय, कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाचा कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदारवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही जनतेच्या वतीने केली जात आहे.