ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुलभ शासकीय योजनांच्या लाभासाठी आजच ‘फार्मर आयडी’ बनवा 

आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन ;

चांदा ब्लास्ट

ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेती आणि शेतकरी होतोय डिजिटल

चंद्रपूर : शेतीला डिजिटल युगाशी जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘ॲग्रिस्टॅक’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी व शेतीसंबंधित विविध शासकीय योजनांचा लाभ डिजिटल माध्यमातून अधिक सुलभ पद्धतीने मिळू शकतो. या योजनांचा लाभ सहजपणे घेता यावा, यासाठी शेतकरी बांधवांनी आजच ‘फार्मर आयडी’ तयार करण्याचे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजनेची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून या योजनेचा जिल्ह्यातील सर्वच शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, या उद्देशाने आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार आवाहन केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमीन नोंदी, पीक उत्पादन, बाजारपेठेतील संधी, शासकीय योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती डिजिटल पद्धतीने एकत्रित केली जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि सोप्या पद्धतीने घेता येणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना वेळेवर मिळावा याकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा, प्रशिक्षण आणि आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आयडी १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकसाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रिस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सीएससी, कृषी विभाग किंवा क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असेही आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ॲग्रिस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

• शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केल्यामुळे अनुदान, पीक विमा, कर्ज आणि अन्य योजनांचा लाभ सहज मिळतो.

• हवामान अंदाज, माती परीक्षण आणि पीक उत्पादनाच्या सुधारित पद्धतींबाबत माहिती मिळते, ज्यामुळे उत्पादन वाढते.

• शेतकऱ्यांना बाजार भावाची अद्ययावत माहिती मिळते, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे थेट विक्री करण्याची संधी मिळते.

• थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनुदान आणि आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

• विविध योजनांच्या लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज नसते, कारण त्यांची सर्व माहिती एकाच डिजिटल डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते.

• पीक विमा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या योजनांचा लाभ सहज मिळतो, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून निघते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये